Bhima Koregaon Bravery Day : आत्मसन्मानासाठी होती भीमा कोरेगावची लढाई! जाणून घ्या काय आहे इतिहास?
Bhima Koregaon Bravery Day : महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यामधील कोरेगाव भिमा या गावात भीमा नदीच्या काठावर झालेली एक ऐतिहासिक लढाई...जी इतिहासात अजरामर झाली. ही लढाई 1 जानेवारी, इ.स. 1818 रोजी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि पेशव्यात झाली होती. या लढाईनंतर पेशव्यांची राजवट संपुष्टात आली. या लढाईत वीर मरण आलेल्या सैनिकांच्या सन्मानार्थ ब्रिटीशांनी जयस्तंभ उभारला. या जयस्तंभावर लाखो अनुयायी हुतात्मा सैनिकांना मानवंदना देण्यासाठी 1 जानेवारी रोजी जमतात.

लढाईत कुणाचे किती होते संख्याबळ?
लढाईवेळी ब्रिटिशांच्या बाजूने एकूण 834 सैनिक होते. त्यांचे नेतृत्व सेनापती कॅप्टन फ्रान्सिस एफ. स्टॉंटनने केले होते. इंग्रजांच्या सैनिकांत 'बॉम्बे नेटिव लाइट इन्फेंट्री तुकडी'चे सुमारे 5 हजार महार रेजिमेंटचे सैनिक होते. यात काही युरोपियन आणि इतर काही सैनिकांचाही समावेश होता. तर पेशव्यांच्या बाजूने 28 हजार सैनिक होते, यांचे नेतृत्व सेनापती पेशवा बाजीराव (दुसरे) करीत होते.
पेशव्यांच्या सैन्याची शेवटी माघार
दुसरे बाजीराव पेशवे यांच्या नेतृत्वाखालील सैन्य कंपनीच्या ताब्यात असलेल्या पुण्यावर हल्ला करण्याच्या मार्गावर होते, त्यावेळी त्यांना कंपनीचे सैन्य आडवे आले. ते पुण्यातील ब्रिटिश सैन्याला मदत देण्यासाठी निघाले होते. पेशव्यांनी कोरेगावात घुसखोरी करणाऱ्या सैन्यावर हल्ला करण्यासाठी सुमारे दोन हजार सैनिक पाठवले. कॅप्टन फ्रान्सिस स्टॉन्टन यांच्या नेतृत्वाखालील कंपनीच्या सैन्याने जवळजवळ बारा तास लढाई केली. मोठ्या ब्रिटिश सैन्याच्या आगमनाच्या भीतीने पेशव्यांच्या सैन्याने शेवटी माघार घेतली. या युद्धाने पेशव्यांची राजवट संपुष्टात आली. यानंतर पुढे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता जवळजवळ संपूर्ण पश्चिम, मध्य आणि दक्षिण भारतात पसरली.
हेही वाचा : National Farmers Day :राष्ट्रीय शेतकरी दिनाचा इतिहास काय आहे? 23 डिसेंबरलाच का साजरा केला जातो? वाचा
पेशवाईच्या काळात मिळाली हिन वागणूक
पेशवाईच्या काळात अस्पृश्यतेचे पालन मोठ्या प्रमाणावर होत होते व महारांना,अत्यंत हीन वागणूक दिली जात असे, याला विरोध म्हणून महार सैनिक आत्मसन्मासाठी ब्रिटिशांच्या बाजूने पेशवे व मराठ्यांविरूद्ध लढले आणि विजयी झाले. 1800 च्या दशकांत पुण्याचे पेशवे, ग्वाल्हेर संस्थानाचे शिंदे, इंदूरचे होळकर, बडोद्याचे गायकवाड आणि नागपूरचे भोसले असे अनेक तुकड्यांत मराठा साम्राज्य विभागलेले होते. काही कालावधीनंतर त्यापैकी ग्वाल्हेर, इंदूर, बडोदा व नागपूर हे मराठा साम्राज्याचे गड ब्रिटिश साम्राज्यात सामील झाले.
हेही वाचा : Vijay Diwas History: विजय दिवसाचा इतिहास आणि महत्त्व काय आहे?, घ्या जाणून
सैनिकांच्या स्मरणार्थ भीमा नदीच्या काठी 75 फूट उंच विजयस्तंभ
कोरेगाव भिमाच्या युद्धानंतर ब्रिटिशांनी सैनिकांच्या स्मरणार्थ भीमा नदीच्या काठी 75 फूट उंच विजयस्तंभ उभारून त्यावर कंपनीच्या 49 सैनिकांची नावे कोरली यामध्ये 20 शहीद व 3 जखमी महार रेजिमेंटच्या सैनिकांची नावे आहेत. या स्तंभावर लिहिले आहे - 'One of the Triumphs of the British Army of the Earth'.
हेही वाचा : Kargil Vijay Diwas: कारगिल विजय दिवसावरील घोषणा, कॅप्शन आणि देशभक्तीने परिपूर्ण असे कोट्स
1 जानेवारी रोजी दिली जाते मानवंदना
महार रेजिमेंटच्या सन्मानार्थ येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी 1 जानेवारी रोजी महाराष्ट्रासह देशभरातून बौद्ध, अन्य दलित, शीख आदी बांधव लाखोंच्या संख्येने येतात. बुद्धमूर्ती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा समोर ठेवून बुद्धवंदना घेऊन शहीद सैनिकांच्या जयस्तंभाला मानवंदना दिली जाते.












Click it and Unblock the Notifications