धस-मुंडे भेटीवर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळांचा टोला; म्हणाले- आता मांडवली..मांडवली..दिसून येतेय
Harshvardhan Sapkal attacks on Suresh Dhas : भाजप आमदार सुरेश धस यांनी राष्ट्रवादीचे नेते व मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतली. संतोष देशमुख हत्याप्रकरणी सुरेश धस यांनी वाल्मीक कराड तसेच धनंजय मुंडे यांच्यावर चांगलाच हल्लाबोल सुरू केला होता. मात्र, आक्रमक भूमिकेनंतर सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याने राज्याच्या राजकारणात चांगलीच चर्चा रंगली आहे. दुसरीकडे या भेटीवरून सुरेश धस यांच्यावर टीका केली जात आहे. आता कॉंग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील निशाणा साधत धसांचा समाचार घेतला.
आता केवळ मांडवली..मांडवली शब्द ऐकायला येतोय
माध्यमांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, पहिले आगा आगा आगा, बंदूक बंदूक बंदूक, रेती रेती रेती, टिप्पर टिप्पर टिप्पर असे शब्द रांगड्या भाषेत मांडल्या जात होती. मात्र आता हे शब्द मागे पडलेत आणि आता मांडवली मांडवली मांडवली, या शब्दाची गुंज या प्रकरणातून ऐकू येत आहे.
राष्ट्रवादीचे महत्त्व कमी करण्यासाठी हे मोठे षडयंत्र
टीआरपी वाढवण्याकरता केलेला हे सगळे प्रकरण होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्त्व कमी करण्याकरता भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी आमदार धस यांना दिलेली सूचना होती, असा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

सुरेश धस व बावनकुळे यांनी दिले स्पष्टीकरण
आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली यावर स्पष्टीकरण देताना धस म्हणाले की तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भेट घेतली होती. तसेच भेट जरी घेतली असली तरी देखील आमचा लढा सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील त्यांच्या निवासस्थानी सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची भेट झाल्याचे सांगितले आहे. जवळपास साडेचार तास भेट झाल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे.
हे ही वाचा : मुंडे साहेब, वाल्मिक अण्णाच्या बातम्या पाहिल्यास तुझा संतोष देशमुख करु; बीडमध्ये पुन्हा मारहाण
इतके डायलॉग मारले ते फक्त नाटक होते का?
दरम्यान, सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीनंतर अनेकांनी सुरेश धस यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या भेटीवर प्रतिक्रिया देताना म्हंटल्या, मी बीडला गेल्यापासून मी कधीही सुरेश धस यांच्या बरोबर मोर्च्यात गेले नाही. मला खात्री होती की हे कधीही पालटतील. मी हे धनंजय देशमुख ह्यांना देखील म्हटले होते.
हे ही वाचा : धस-मुंडे भेटीचे राजकारण तापलं; संजय राऊत म्हणाले-धसांनी देशमुख कुटुंबियांच्या अश्रूंचा बाजार मांडला
आज प्रश्न पडतो की धसांना हृदय आहे की नाही? धसांचे पाय कसे चालले? कसे गेले ते धनंजय मुंडेंची भेट घ्यायला? एका कुटुंबाला न्याय मिळवून देणार होता ना? इतके निर्दयी कसे हे राजकारणी? इतक्या मोर्च्यांमध्ये गेलात, इतके डायलॉग मारले ते फक्त नाटक होते? किळस आली आहे ह्या सगळ्यांची, अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.












Click it and Unblock the Notifications