कोण होते शिवराज पाटील चाकूरकर? लातूरमधूनर राजकीय कारकीर्द ते देशाचे गृहमंत्री, वाचा कारकिर्द, जीवन
Who Was Shivraj Patil Chakurkar : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज विश्वनाथ पाटील चाकूरकर यांचे आज १२ डिसेंबर रोजी सकाळी लातूर येथे निधन झाले. मराठवाडा ते दिल्लीपर्यंतच्या राजकारणात त्यांनी आपल्या शांत आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्वाने एक वेगळी छाप सोडली होती. देशाच्या दोन सर्वोच्च घटनात्मक पदांवर (लोकसभा सभापती आणि केंद्रीय गृहमंत्री) काम करण्याचा मान त्यांना मिळाला होता. त्यांच्या गौरवशाली जीवन आणि राजकीय कारकिर्दीचा घेतलेला हा आढावा.

प्रारंभिक जीवन आणि शिक्षण
- जन्म: १२ ऑक्टोबर १९३५, चाकूर, जिल्हा लातूर (तत्कालीन हैदराबाद संस्थान)
- शिक्षण: उस्मानिया विद्यापीठातून विज्ञान विषयात पदवी, मुंबई विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण
- व्यवसाय: राजकारणात येण्यापूर्वी वकिलीचा व्यवसाय.
राजकीय कारकीर्द आणि महत्त्वाचे टप्पे
चाकूरकर पाटील यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात लातूर नगरपालिकेच्या राजकारणातून केली. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र आणि राष्ट्रीय राजकारणात अनेक महत्त्वाची पदे भूषवली.
महाराष्ट्रातील कारकीर्द (१९७२-१९८०)
विधानसभा: ते दोन वेळा (१९७२ आणि १९७८) लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघामधून निवडून आले. महाराष्ट्र शासनामध्ये त्यांनी सार्वजनिक उपक्रम समितीचे अध्यक्ष, उपमंत्री (कायदा व न्याय, पाटबंधारे, प्रोटोकॉल), तसेच महाराष्ट्र विधानसभेचे उपसभापती आणि सभापती म्हणून जबाबदारी सांभाळली.
सर्वात महत्त्वाची पदे
१० वे लोकसभा सभापती
कार्यकाळ: १९९१ ते १९९६
विशेष योगदान:
- चाकूरकर यांनीच देशात उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार देण्याची सुरुवात केली.
- संसद कामकाजाचे थेट प्रक्षेपण सुरू करण्यात आणि संसद ग्रंथालय इमारतीच्या बांधणीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
केंद्रीय गृहमंत्री
- कार्यकाळ: २००४ ते २००८
- विशेष योगदान:
- डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यू.पी.ए. (UPA) सरकारमध्ये त्यांनी हे दुसरे सर्वात महत्त्वाचे पद भूषवले.
- २६/११ च्या मुंबई हल्ल्यानंतर नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा दिला.
पंजाबचे राज्यपाल
कार्यकाळ: २०१० ते २०१५
विशेष योगदान:
या काळात ते चंदिगढ केंद्रशासित प्रदेशाचे प्रचालक देखील होते.
हेही वाचा : Shivraj Patil : शिवराज पाटील चाकूरकरांनी का दिला होता गृहमंत्रीपदाचा राजीनामा? 'हे' होते मोठे कारण
राष्ट्रीय राजकारण आणि केंद्रीय मंत्रीपदे
लोकसभा सदस्यत्व: १९८० साली ते प्रथम लातूर लोकसभा मतदारसंघामधून लोकसभेवर निवडून आले. त्यानंतर त्यांनी सलग सात वेळा (१९८० ते १९९९ पर्यंत) या मतदारसंघाचे लोकसभेत प्रतिनिधित्व केले.
केंद्रीय मंत्री
इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी संरक्षण राज्यमंत्री, वाणिज्य, विज्ञान-तंत्रज्ञान, अणुऊर्जा, इलेक्ट्रॉनिक्स, अवकाश आणि नागरी विमान वाहतूक आणि पर्यटन (स्वतंत्र प्रभार) यांसारख्या अनेक महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळली.
योगदान आणि वारसा
शिवराज पाटील चाकूरकर हे राजकारणात आपल्या स्वच्छ प्रतिमेसाठी, सखोल अभ्यासासाठी आणि शांत कार्यशैलीसाठी ओळखले जात होते. वक्ता म्हणून ते प्रभावी होतेच, पण त्यासोबतच ते एक लेखक म्हणूनही परिचित होते. त्यांनी "Reminiscences and Reflections", "Emerging Vision of India" यांसारख्या चार पुस्तकांचे लेखन केले आहे. त्यांच्या निधनाने भारतीय राजकारणातील एका सुसंस्कृत पर्वाचा अंत झाला आहे.












Click it and Unblock the Notifications