राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊ शकतात का? दोघे एकत्र आल्यास महाराष्ट्राच्या राजकारणात काय होईल? वाचा
Raj Thackeray and Uddhav Thackeray : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले. महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे. या पराभवानंतर महाविकास आघाडीतील शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 10, काँग्रेसला 16, शिवसेना उद्धव ठाकरेंच्या पक्षाला 20 जागा मिळाल्या. यंदा उद्धव ठाकरे यांना मोठे यश मिळेल असा अंदाज होता पण तो आता फोल ठरला आहे.
दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाही या निवडणुकीत कमालीचे अपयश आले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात गाजत असलेली महत्त्वाची चर्चा म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे भाऊ एकत्र येणार का, ही आहे. खरंच जर हे दोन भाऊ एकत्र आले, तर काय होईल? मराठी अस्मिता आणि राजकीय समीकरणांवर याचा कसा परिणाम होईल, हे आपण सविस्तर पाहणार आहोत.

राजकारणात 'भूकंप' घडवणारी शक्यता
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन भाऊ एकत्र आले, तर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडू शकतो. दोघांच्याही नेतृत्वाने मराठी अस्मितेला नवी उंची दिली आहे. पण सध्या ते दोन वेगळ्या वाटांवर आहेत. त्यांच्या एकत्र येण्याची गरज का निर्माण झाली आहे? हे समजून घेणे आवश्यक आहे.
मनसेची ताकद आणि शिवसेनेचे संघटन
राज ठाकरे यांचा प्रभाव प्रामुख्याने शहरी भागांत आहे. मुंबई, ठाणे, नाशिक येथे त्यांची मोठी ताकद आहे. त्यांचा तरुणांमध्ये प्रचंड चाहता वर्ग आहे, विशेषतः त्यांच्या ठाम भूमिकांमुळे. पण, मनसेची मते शिवसेनेच्या पारंपरिक मतांवर परिणाम करत असल्याचे वारंवार दिसून आले आहे. तर, दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची शिवसेना संघटन गावपातळीपर्यंत मजबूत आहे. ग्रामीण भागातील मतदार त्यांच्यावर आजही विश्वास ठेवतो. महाविकास आघाडीत शिवसेनेची भूमिका निर्णायक ठरलीय. ज्यामुळे पक्षाला अधिक व्यासपीठ मिळाले आहे.
हेही वाचा : कोकणपट्ट्याचा उद्धव ठाकरेंना तडाखा; बालेकिल्ला उद्धवस्त! राणे कुटुंबाचे वर्चस्व पुन्हा सिद्ध
एकत्र येण्याचे सकारात्मक परिणाम
- जर राज आणि उद्धव एकत्र आले, तर मराठी अस्मिता आणि प्रादेशिक विकासाचा मुद्दा पुन्हा चर्चेत येईल.
- मुंबईतील मराठी मतांचे एकत्रीकरण होईल.
- मनसेच्या शहरी मतदारांपासून ते शिवसेनेच्या ग्रामीण मतदारांपर्यंत एक प्रबळ मोर्चा तयार होऊ शकतो.
- भाजप आणि शिंदे गटाची पकड सध्या महायुतीमध्ये मजबूत आहे. पण राज-उद्धव यांची युती भाजपला थेट आव्हान ठरू शकते.
- विशेषतः मुंबई महापालिका निवडणुकीत या युतीचा प्रभाव दिसेल.
- राज ठाकरे यांच्या भाषणकौशल्यामुळे तरुण मतदार मोठ्या प्रमाणावर आकर्षित होऊ शकतो.
- उद्धव ठाकरे यांच्या संघटन कौशल्यामुळे या मतांना योग्य दिशा मिळेल.
हेही वाचा : उद्धव ठाकरे यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर; मुंबई, कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल वाढली, पुढचं भवितव्य कसं?
संभाव्य आव्हाने
राज आणि उद्धव यांच्या विचारसरणीत मोठा फरक आहे. नेतृत्वावरून संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ठाकरेंची शिवसेना सध्या महाविकास आघाडीत आहे. जर मनसेशी हातमिळवणी झाली, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना आपली भूमिका बदलावी लागेल. राज आणि उद्धव यांनी अनेकदा एकमेकांवर टीका केलीय. ती टीका हे दोघे विसरू शकतील का, हाही प्रश्न आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम
जर खरंच राज आणि उद्धव एकत्र आले तर महाराष्ट्रात भाजप-शिवसेना (शिंदे गट) विरुद्ध एक मजबूत प्रादेशिक पक्ष उभा राहू शकतो. मनसेमुळे शहरी भागांमध्ये भाजपला झटका बसू शकतो. ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसला पर्याय मिळू शकतो. या शिवाय मुंबई, नाशिक, पुणे यासारख्या महत्त्वाच्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये राज-उद्धव यांची युती निर्णायक ठरेल.
हेही वाचा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंचा पराभव का झाला?, ठाकरे ब्रॅंड महाराष्ट्रात का चालला नाही
राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले, तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल घडू शकतो. मात्र, यासाठी दोघांनीही व्यक्तिगत मतभेद दूर गरजेचे आहे. हे दोघे महाराष्ट्राला नवी दिशा देऊ शकतील. तुम्हाला काय वाटते, ही युती होईल का? आणि ती झाल्यास महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होईल? कमेंटमध्ये नक्की कळवा. पाहत रहा, वन इंडिया मराठी.












Click it and Unblock the Notifications