Maharashtra Weather पुढचे 48 तास खूप महत्वाचे, या जिल्ह्यात जोरदार पाऊस, विदर्भाला चक्रीवादळाचा धोका
Maharashtra Weather Raga Cyclone Threatens Vidarbha : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल झाला आहे. आज अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता असून, विदर्भावर चक्रीवादळाचे संकट घोंघावत आहे.
बंगालच्या उपसागरातून 'रागा' नावाचे चक्रीवादळ विदर्भाच्या दिशेने वेगाने सरकत असल्याची माहिती नागपूरच्या हवामान विभागाने दिली आहे. यामुळे विदर्भात मुसळधार पावसाचा 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे.

राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
मुंबईसह केंद्रीय हवामान विभागाने पुढील काही दिवस महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. आजपासून राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. मराठवाड्यापासून विदर्भ आणि कोकणापर्यंत सर्वत्र पावसाचे अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे आधीच पुराच्या तडाख्याने झालेल्या पिकांच्या नुकसानीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
कोकण आणि मध्य महाराष्ट्र
येत्या २४ तासांमध्ये कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये तसेच मध्य महाराष्ट्रातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.
मराठवाडा
मराठवाड्यातील लातूर, नांदेड, धाराशिव आणि बीड जिल्ह्यांना आधीच पुराचा फटका बसला आहे. या संकटात आणखी भर पडण्याची शक्यता असून, येथे ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस होण्याचा अंदाज आहे.
मुंबई आणि पुणे
मुंबई शहर, उपनगर, ठाणे, आणि पालघरमध्ये या आठवड्यात अतिवृष्टीची शक्यता आहे. पुणे आणि आसपासच्या भागात आकाश मुख्यतः ढगाळ राहील आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुण्यात २७ ते २९ सप्टेंबर दरम्यान विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. घाटमाथ्यावरही उद्या जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, २७ आणि २८ सप्टेंबर रोजी जोरदार पाऊस पडणार असल्याने अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे.
२८, २९ रोजी अतिवृष्टीचा इशारा
भारतीय हवामान विभागाने २८ व २९ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग, जलसंधारण, जलसंपदा, बांधकाम, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व जिल्हा परिषद पाटबंधारे विभाग यांसह सर्व आपत्तीशी संबंधित विभागांनी एकमेकांत समन्वय ठेवून अतिवृष्टीपासून सर्वसामान्य शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तात्काळ कराव्यात, अशा सूचना राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या आहेत.
हेही वाचा : सावधान.. 'या' 2 दिवशी महाराष्ट्राला पाऊस झोडपणार! काळजी घ्या, सरकारचे आवाहन, 48 खूपच महत्वाचे












Click it and Unblock the Notifications