पोटनिवडणुकीचे बिगुल! दादांच्या निधनानंतर बारामतीसह राहुरीत या दिवशी मतदान, तर निकाल कधी?
Maharashtra assembly bypolls 2026 : महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्यातील रिक्त असलेल्या महत्त्वाच्या विधानसभा जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
यामध्ये हायव्होल्टेज ठरलेल्या बारामती आणि अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. या दोन्ही जागांवर 23 एप्रिल 2026 रोजी मतदान होणार असून, 4 मे रोजी निकाल लागणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीत निवडणूक होणार असून या ठिकाणी सुनेत्रा पवार या निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत.

बारामती: सुनेत्रा पवार रिंगणात
बारामती हा नेहमीच राज्याचा केंद्रबिंदू राहिला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर या पोटनिवडणुकीसाठी महायुतीकडून सुनेत्रा पवार यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.
लोकसभा निवडणुकीतील 'नणंद-भावजय' अशा लढतीनंतर आता अजित दादांच्या निधनानंतर विधानसभा पोटनिवडणुकीत बारामतीकर कोणाला साथ देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
ही पोटनिवडणूक अजित पवार गटासाठी अस्तित्वाची लढाई मानली जात आहे. सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा बारामतीवर आपले वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न महायुतीकडून केला जाणार आहे.
राहुरी: उमेदवारीचा सस्पेन्स कायम
बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांचे नाव चर्चेत असताना, राहुरी विधानसभा मतदारसंघाबाबत मात्र अद्याप कमालीची गुप्तता पाळली जात आहे. भाजपचे दिवंगत आ. शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राहुरी विधानसभा निवडणुकीसाठी यापूर्वीच अंतिम मतदार यादीची घोषणा करण्यात आलेली आहे. या ठिकाणी 3 लाख 33 हजार 307 मतदारांची नोंदणी झालेली असून यात 1 लाख 72 हजार 173 पुरुष तर 1 लाख 61 हजार 133 महिला मतदार यांचा समावेश आहे. दरम्यान, निवडणूक कार्यक्रमाची घोषणा झाल्याने आता या ठिकाणी उमेदवार कोण असणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
बारामती आणि राहुरी मतदारसंघात पोटनिवडणुकीची घोषणा
या व्यतिरिक्त गोवा, गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र, नागालँड, त्रिपुरा राज्यातील पोटनिवडणुकांची देखील घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रात राहुरी आणि बारामती या दोन मतदारसंघांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.
महाराष्ट्रातील बारामती आणि राहुल विधानसभा मतदारसंघासाठी 23 एप्रिलला मतदान होईल आणि 4 मे रोजी निकाल जाहीर होतील, असं निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलं आहे.












Click it and Unblock the Notifications