बबनरावांना श्रीगोंद्यात पुन्हा विजयश्री मिळणार का? यंदा घरातूनच विरोध! 'विधानसभे'ला काटें की टक्कर
Babanrao Pachapute vs sajan pachpute : लोकसभा निवडणुकीनंतर आता राजकीय नेत्यांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. दिवाळीनंतर विधानसभा निवडणूक होणार आहे. सर्वच इच्छुक उमेदवार आपल्या पद्धतीने कामाला लागले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा मतदारसंघ सध्या चांगलाच चर्चेत आहे. या ठिकाणी विद्यमान आमदार बबनराव पाचपुते आहेत. मतदार संघावर पकड असलेला अनुभवी नेता अशी त्यांची ओळख आहे.
राज्यातील भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी ते एक आहेत. आतापर्यंत सात वेळा आमदार म्हणून ते निवडून आले. पण, यावेळी बबनरावांची वाट खडतर दिसते. त्यांच्या विजयाच्या मार्गात पुतण्या साजन पाचपुते उभे आहेत. घरातूनच बबनरावांना विरोध सुरू झाला. त्यामुळे बबनराव सहाव्यांदा विधानसभेत पोहोचणार का, हे बघणे औत्सुक्याचे आहे.

जनता पक्षाचे आमदार म्हणून 1980 मध्ये पहिल्यांदा बबनरावांचा विधानसभेत प्रवेश झाला. पुढे बबनराव 1985, 1990, 1995, 2004, 2009 आणि 2019 च्या निवडणूकांमध्ये जनता पक्ष, जनता दल, काँग्रेस, अपक्ष आणि भारतीय जनता पक्षाकडून निवडून आले. जनसामान्यांचा नेता म्हणून सर्वत्र ओळख. या काळात बबनराव पक्ष बदलत राहिले, सात वेळा सात चिन्हांवर निवडून येण्याचा त्यांच्या नावावर विक्रम आहे.
बबनरावांसमोर पुतण्याचे आव्हान!
2014 साली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आता याच बबनरावांना त्यांचे पुतणे साजन पाचपुते यांनी आव्हान उभे केलेआहे. साजन यांनी गतवर्षी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. या पक्षाचे ते आता उपनेते आहेत. पक्ष प्रवेशापासूनच साजन तयारीला लागले आहेत.

महायुतीकडून बबनराव प्रमुख दावेदार आहेत.बबनराव यांच्यासाठी पॉझिटिव्ह वातावरण आहे. पण, त्यांनी स्वतः निवडणूक लढवली तर सध्या त्यांच्या शारीरिक अस्वस्थामुळे मुलं किंवा पत्नी यांना उमेदवारी मिळू शकते. नाहीतर महायुतीकडून अजित पवार गटाच्या अनुराधा नागवडे यांचे पारडं जड राहील. तसे पाहिले तर पाचपुते व नागवडे कट्टर विरोधक, पण महायुतीमुळे एकत्र आले आहेत.
दुसरीकडे महाविकास आघाडीत हा मतदारसंघ ठाकरे गट, कॉंग्रेस की राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार या तीन पैकी कोणत्या पक्षाच्या वाट्याला जाणार हे अजून ठरलेले नाही. त्यामुळे साजन यांना अगोदर उमेदवारीसाठीच झगडावे लागणार आहे. या मतदारसंघाच्या जातीय समीकरणाचा विचार केला तर मराठा मतदारांची संख्या अधिक आहे.

गतवेळी राष्ट्रवादी काँग्रेसला दिली होती मात
सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीत बबनराव विजयी झाले. परंतु त्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार असलेले घनश्याम शेलार यांनी बबनरावांना चांगलेच झुंजविले होते. अवघ्या 4 हजार 750 मतांच्या फरकाने बबनराव विजयी झाले होते.
शेलारांचे काय चालले?
घनश्याम शेलार यांना राष्ट्रवादीकडून विधान परिषदेची अपेक्षा होती. परंतु, पक्षाने त्यांना मागच्या दाराने आमदार केले नाही. त्यामुळे त्यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केला होता. तथापि, बीआरएसने मैदानात उतरण्यापूर्वीच महाराष्ट्रातून पळ काढला. त्यामुळे शेलार कॉंग्रेसमध्ये सामील झाले. त्यांचाही या मतदारसंघात चांगला संपर्क आहे. महाविकास आघाडीकडून तेही प्रबळ दावेदार आहेत. दुसरीकडे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ हा अहमदनगर लोकसभा मतदारसंघांतर्गत येतो.
शरद पवार गटाचाही दावा
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार नीलेश लंके यांनी अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या डॉ. सुजय राधाकृष्ण विखे पाटील यांचा 28929 मतांच्या फरकाने पराभव केला. त्यामुळे पवार गटाचा आत्मविश्वास वाढला असून, पक्ष महविकास आघाडीकडून या मतदारसंघावर दावा करू शकतो. शरद पवार गटाचे माजी आमदार राहुल जगताप हेसुद्धा अजून माघार घेताना दिसत नाहीत. हे कुकडी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आहेत. तसेच जिल्हा बँक संचालक आहेत.
भाजपकडून इच्छुक कोण?
या मतदारसंघात भाजपमधूनच अनेकजण इच्छुक आहेत. माजी मंत्री शिवाजी कर्डिले, सुवर्णा पाचपुते यांनी निवडणुकीची तयारी केली आहे. निवडणुकीसाठी गेल्या वर्षभर त्या श्रीगोंदा मतदार संघात जनसंपर्क करत आहेत. त्यातच सुवर्णा पाचपुते यांचे 'फिक्स उमेदवार सर्वसामान्य जनतेतील आमदार' अशा आशयाचे बॅनर श्रीगोंदा मतदारसंघात लागले होते. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
सुवर्णा पाचपुते यांची गेल्या विधानसभा निवडणुकीतच तयारी झाली होती. मात्र, ऐनवेळेस पक्षातील वरिष्ठांनी थांबण्यास सांगितल्यामुळे आपण थांबलो होतो. परंतु, यावेळेस सर्वच वरिष्ठ नेते आपल्याबरोबर असून भाजपचे सर्व कार्यकर्ते आपल्याला उमेदवारीसाठी गळ घालत आहेत. जनतेच्या मनातील आमदार असल्यामुळे यावेळेस भाजपकडून श्रीगोंदा मतदारसंघात आपल्यालाच उमेदवारी मिळेल असा दावा सुवर्णा पाचपुते यांनी केला आहे.
प्रचार कोणत्या मुद्यांवर होईल?
बबनरावांनी तालुक्यात साडेसहाशे एकरमध्ये एमआयडीसीचा प्रकल्पासाठी पाठवा केला. यात त्यांना यश मिळाले. तालुक्यात रस्ते पाझर तलाव मागेल त्याला विहीर शेततळे अशा योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्या. या आधारे ते प्रचार करू शकतील. पण, शहरात ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाची मागणी अपूर्ण आहे. या मतदारसंघात विकास कामांऐवजी सुखदुःखात गाठीभेटी, वाढदिवस, लग्न, वर्षश्राद्ध आदी कार्यक्रमांत हजेरी लावून मतदार जोडले जातात.
अचानक बदलतात पक्ष
या मतदारसंघात बबनराव असो की शेलार अण्णा यांनी पक्ष बदललेला आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीपूर्वीही कोण कोणत्या पक्षात असेल याची शाश्वती नाही. इथे सध्या तरी सर्वच पक्षांचे उमेदवार इच्छुक असून जोरदार तयारीसुद्धा सुरू आहे.
-
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!







Click it and Unblock the Notifications