Tilk Varma: गरिबीतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपर्यंतचा प्रवास! T-20 चा नवा तारा- तिलक वर्मा, वाचा संघर्ष
Tilak Varma Journey : आशिया कप स्पर्धेतील अंतीम सामन्यात भारताने पाकिस्तानवर ५ गडी राखून विजय संपादन केला. हा विजय अविस्मरणीय आहे कारण त्याआधी पाकच्या नापाक कुरापतींनी पहलगाम हल्ला घडला होता, त्यानंतर सिंदूर ऑपरेशन आणि आता क्रिकेटमधील सिंदूर ऑपरेशनमध्ये पाकला भारताने पराभवाची धुळ चारली. या सर्व सामन्यात भारतातर्फे एक असा चेहरा संकट मोचक ठरला, ज्याने केवळ विजयच मिळवून दिला नाहीतर भारताची शान आणि सन्मान दोन्हीही राखला.
आज आपण याच तिलक वर्माची कहाणी जाणून घेऊया. ज्याने कोट्यवधी भारतीयांचे मनच जिंकले नाहीतर भारतीयांच्या हृदयात आपले स्थान राखले. हा उमदा खेळाडू आता क्रिकेटविश्वातील नवा तारा म्हणून ओळखला जाऊ लागला आहे.

नामबोरी ठाकूर तिलक वर्मा असे तिलक वर्माचे पुर्ण नाव.. हैदराबाद, तेलंगणा येथील हा युवा क्रिकेटपटू अल्पावधीतच भारतीय क्रिकेटमधील एक आश्वासक चेहरा बनला आहे. २९ सप्टेंबर २०२५ रोजी आशिया कप फायनलमध्ये त्याने भारताला विजय मिळवून दिल्यानंतर त्याची कारकीर्द सध्या शिगेला पोहोचली आहे.
डावखुरा फलंदाज आणि उपयुक्त ऑफ-स्पिन गोलंदाज तो आहे.
गरीबी, संघर्ष अन् आंतरराष्ट्रीय क्रिकेटपर्यंत प्रवास
तिलकच्या सुरुवातीच्या आयुष्यात आर्थिक अडचणी होत्या. त्याचे वडील नामबोरी नागाराजू हे इलेक्ट्रिशियन म्हणून काम करत होते आणि आई गायत्री देवी गृहिणी होत्या. मात्र, आर्थिक मर्यादा असतानाही त्यांनी तिलकच्या क्रिकेटच्या स्वप्नांना पूर्ण पाठिंबा दिला. वयाच्या ११ व्या वर्षी प्रशिक्षक सलीम बयाश यांनी तिलकला टेनिस-बॉल क्रिकेट खेळताना पाहिले. त्यांनी त्याला हैदराबादमधील लेगला क्रिकेट अकादमीत प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. प्रशिक्षणासाठी तिलक दररोज ४० किलोमीटरहून अधिक प्रवास करत असे. त्याच्या या प्रवासात प्रशिक्षक बयाश यांनी दिलेले पाठबळ खूप महत्त्वाचे ठरले.
देशांतर्गत यश आणि आयपीएल प्रवेश
सातत्यपूर्ण कामगिरी करत तिलकच्या देशांतर्गत क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात झाली. त्याने २०१८-१९ हंगामात हैदराबादसाठी पदार्पण केले आणि लवकरच तो संघाचा महत्त्वाचा खेळाडू बनला. त्याच्या कौशल्याने मुंबई इंडियन्सचे लक्ष वेधले आणि २०२२ च्या आयपीएल (IPL 2022) हंगामात त्याला संघात स्थान मिळाले. पहिल्याच सत्रात त्याने आपल्या दमदार कामगिरीने छाप सोडली.
आंतरराष्ट्रीय पदार्पण आणि विक्रमी कामगिरी
३ ऑगस्ट २०२३ रोजी वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत त्याने आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये पदार्पण केले. पहिल्याच सामन्यात त्याने २२ चेंडूत ३९ धावा करून सर्वांना प्रभावित केले आणि दोन झेलही घेतले. त्यानंतरच्या सामन्यांमध्ये त्याने पहिले आंतरराष्ट्रीय अर्धशतक (Fifty) झळकावले आणि असा पराक्रम करणारा तो दुसरा सर्वात तरुण भारतीय खेळाडू ठरला. त्याने ही मालिका भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणून पूर्ण केली.
टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात शतकं
नोव्हेंबर २०२४ मध्ये, तिलकने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५६ चेंडूत १०७ धावांची नाबाद खेळी करत आपले पहिले टी-२० आंतरराष्ट्रीय शतक झळकावले. त्यानंतरच्या सामन्यात त्याने केवळ ४७ चेंडूत १२० धावांची नाबाद स्फोटक खेळी केली. टी- २० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग दोन शतके झळकवणारा आणि टी-२० शतक झळकावणारा तो दुसरा सर्वात तरुण खेळाडू बनला.
२०२५ मध्ये त्याने हॅम्पशायर संघाकडून चार सामन्यांसाठी काउंटी चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला आणि नॉटिंगहॅमशायरविरुद्ध ११२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करून आपले अष्टपैलूत्व सिद्ध केले.
तिलक वर्मा - सौज्वळ, नम्र, कुटुंबवत्सल
क्रिकेटपासून दूर, तिलक वर्मा त्याच्या नम्रतेसाठी आणि कौटुंबिक मूल्यांसाठी ओळखला जातो. त्याच्या यशामध्ये तो नेहमीच पालक आणि प्रशिक्षकांचे महत्त्व अधोरेखित करतो. त्याचा हा प्रवास कठोर परिश्रम आणि प्रतिभेच्या जोरावर यश कसे मिळवता येते, याचे उत्तम उदाहरण आहे.
हेही वाचा : तिकडे भारत जिंकला! इकडे पंतप्रधान मोदींकडून पाकिस्तानला झोंबणारे 'ट्वीट' वाचा पीएम मोदी काय म्हणाले?












Click it and Unblock the Notifications