चॅम्पियन ट्रॉफीत IND vs PAK : आत्तापर्यंत झालेत पाच सामने; कोण ठरले वरचढ? काय सांगतोय इतिहास?
Ind vs Pak Match History : आयसीसीच्या चॅम्पियन ट्राॅफीत आज भारत विरुद्ध पाकिस्तान या दोन संघात लढत होत आहे. ही पारंपारिक लढत असून दोन्ही देशाचे या लढतीकडे लक्ष लागले आहे, या लढतीत कोण जिंकणार हे कळणार आहे. आपण आज जाणून घेऊ की, चॅम्पियन ट्राॅफीत दोन्ही देशात कोण आतापर्यंत वरचढ ठरलेले आहे.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी- २०२५ मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामना २३ फेब्रुवारीला होणार आहे. हा बहुप्रतिक्षित सामना दुबई क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. भारताने आत्तापर्यंत २००२ आणि २०१३ अशी दोनदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. तर पाकिस्ताननेही २०१७ मध्ये विजेतेपद मिळवले आहे. भारत-पाकिस्तान स्पर्धेचा इतिहास पाहता, हा सामना हाय होल्टेजचा होणार आहे. दुसरीकडे पाकिस्तान ३० वर्षांत प्रथमच आयसीसी स्पर्धेचे आयोजन करत असल्याने त्यांचा संघही भारताविरोधात चांगली कामगिरी करण्याच्या प्रयत्नात दिसणार आहे.

किती लढती झाल्या?
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील स्पर्धा अनेक दशकांपासून सुरू आहे. मात्र आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये हे दोन्ही संघ आत्तापर्यंत फक्त पाच वेळा एकमेकांसमोर आले आहेत . इतर सामन्यांत भारताचा पगडा असला तरी, चॅम्पियन्स ट्रॉफीत मात्र पाकिस्तानने भारतावर ३-२ अशी किंचित आघाडी घेतली आहे. या पाच सामन्यांत काय झाले होते तेच आपण पाहू...

वर्षे २००४
चॅम्पियन्स ट्रॉफीची २००४ च्या स्पर्धेत बर्मिंगहॅम येथे भारत-पाक पहिला सामना झाला होता. भारताने प्रथम फलंदाजी केली. मात्र भारताचा संघ गोंधळलेला दिसला. भारताने सान्यांच्या ३४ षटकांत सहा गड्यांच्या मोबदल्यात १०६ धावा केल्या होत्या. त्यानंतर राहुल द्रविडने (६७) तळाच्या अजित आगरकर (४७) च्या मदतीने भारताला २०० धावांचा पल्ला गाठून दिला. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्ताननची सुरुवात खराब झाली. इरफान पठाणने सुरुवातीलाच तीन विकेट घेतल्याने पाकिस्तान बॅकफुटला गेला. मात्र त्यानंतर इंझमान-उल-हक (४१) आणि मोहम्मद युसूफ (नाबाद ८१) या दोघांनी ४९.२ षटकांत संघाला विजय मिळवून दिला.
वर्ष २००९
यावर्षी सेंच्युरियनमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीतही पाकिस्तानने भारताला हरवले होते. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने शोएब मलिकच्या १२८ आणि मोहम्मद युसूफच्या ८७ धावांच्या जोरावर ५० षटकांत ९ बाद ३०२ धावांचा डोंगर उभारला होता. भारताकडून आशिष नेहराने चार विकेट घेतल्या. प्रत्युत्तरात भारताच्या गौतम गंभीर (५७) आणि राहुल द्रविड (७६) यांनी थोड्याफार प्रमाणात पाकिस्तानशी झुंज दिली. मात्र त्यांच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना जास्त वेळ टिकू दिले नाही. मधल्या फळीत सुरेश रैनाने (४६) थोडीफार झुंज दिली मात्र भारताने हा सामना ५४ धावांनी गमावला.
वर्ष २०१३
यावेळी झालेल्या चॅम्पियन ट्राँफीत भारताचा विजय मिळवला होता. कर्णधार एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानला ३९.२ षटकांत १६५ धावांवर रोखले. पावसाने खेळ खराब केल्याने भारतासमोर २२ षटकांत १०२ धावांचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले. शिखर धवनने ४८ धावांची खेळी केली तर विराट कोहली २२ धावांवर नाबाद राहिला. भारताने आठ विकेट्सनी सामना जिंकला.
वर्ष २०१७
या चॅम्पियन ट्राँफीत प्रथम फलंदाजी करताना भारताने रोहित शर्मा (९१) आणि शिखर धवन (६८) यांच्या मदतीने पहिल्या विकेटसाठी १३६ धावांची भागीदारी करून विजय मिळवला. विराट कोहलीच्या नाबाद ८१ आणि युवराज सिंगच्या ३२ चेंडूत ५३ धावांच्या जोरावर भारताने ५० षटकांत ३ बाद ३१९ धावा केल्या. प्रत्युत्तरात, पाकिस्तानचा संघ ३३.४ षटकांत १६४ धावांवरच आटोपला.
वर्ष २०१७
या चॅम्पियन ट्राँफीत अंतिम सामन्यात हे दोन्ही संघ आमनेसामने आले. ओव्हल येथे झालेल्या अंतिम सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघ हारला. शतकवीर फखर जमान (११४) आणि अझर अलीच्या ५९ धावांच्या शानदार फटकेबाजीमुळे पाकिस्तानने ५० षटकांत ४ बाद ३३८ धावा केल्या. प्रत्युत्तरात, भारतीय फलंदाजांवर दबाव आला. हार्दिक पंड्या वगळता इतर कोणताही फलंदाज टिकाव धरु शकला नाही. अखेर ३०.३ षटकांत १५८ धावांवर भारताचा डाव आटोपला.












Click it and Unblock the Notifications