Ind vs Sa 1st Test : दक्षिण आफ्रिकेने 'नाकावर टिच्चून' मिळवला विजय! भारताचा दारुण पराभव!
ind vs sa 1st test south africa beat india : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना अवघ्या तीन दिवसांतच संपुष्टात आला. कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाला लोळवत ३० धावांनी विजय मिळवला आणि मालिकेत १-० अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली.
भारतीय संघाच्या या निराशाजनक प्रदर्शनामुळे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या चेहऱ्यावरील नाराजी स्पष्टपणे दिसत होती. आता मालिकेत टिकून राहण्यासाठी दुसऱ्या कसोटीत भारतासमोर 'करो या मरो'ची परिस्थिती निर्माण झाली आहे.

बुमराहचा 'पंच', पण फलंदाज फेल
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय दक्षिण आफ्रिकेला महागात पडला. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर पाहुण्यांचा पहिला डाव केवळ १५९ धावांत गुंडाळला.
बुमराहचा कहर
जसप्रीत बुमराहने १४ षटकांत २७ धावा देत ५ बळी घेतले. कसोटी कारकिर्दीतील ही त्याची १६ वी पाच विकेट्सची कामगिरी ठरली आणि यापैकी १३ वेळा त्याने SENA (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया) देशांविरुद्ध हे यश मिळवले आहे.
आफ्रिकेची फलंदाजी
एडन मार्करमने (३१) सर्वाधिक धावा केल्या, तर मुल्डर आणि जॉर्जी यांनी प्रत्येकी २४ धावांचे योगदान दिले. भारताचा पहिला डावही फारसा प्रभावी ठरला नाही. सलामीवीर के.एल. राहुल (३९), वॉशिंग्टन सुंदर (२९), रवींद्र जाडेजा (२७) आणि ऋषभ पंत (२७) यांनी चांगली सुरुवात केली, पण मोठी खेळी साकारू शकले नाहीत. कर्णधार शुभमन गिल ४ धावांवर दुखापतग्रस्त (रिटायर्ड हर्ट) झाला.
भारताचा पहिला डाव १८९ धावांवर संपला आणि त्यांना ३० धावांची निसटती आघाडी मिळाली. दक्षिण आफ्रिकेसाठी ऑफ-स्पिनर सायमन हार्मरने ४, तर मार्को जान्सेनने ३ बळी घेतले.
बावुमाची झुंजार खेळी ठरली निर्णायक!
दुसऱ्या डावातही भारतीय गोलंदाजांनी जोरदार मारा करत आफ्रिकेच्या ७ विकेट्स केवळ ९१ धावांत पाडल्या होत्या. रवींद्र जाडेजाने मार्करम, मुल्डर, डी झोरजी आणि स्टब्स यांना बाद करत आफ्रिकेच्या डावाची गाडी रुळावरून खाली उतरवली.
मात्र, कर्णधार टेम्बा बावुमा याने एकाकी झुंज देत डाव सावरला. दुसऱ्या दिवसाच्या शेवटच्या तासात त्याने दाखवलेला इंटेंट आणि तिसऱ्या दिवशी कॉर्बिन बॉश (२५) सोबत आठव्या विकेटसाठी केलेली ४४ धावांची भागीदारी निर्णायक ठरली. बावुमाने १३६ चेंडूत ४ चौकारांसह नाबाद ५५ धावा करत जिद्दीची खेळी साकारली.
भारताची गोलंदाजी
भारताकडून रवींद्र जाडेजाने सर्वाधिक ४ बळी घेतले, तर मोहम्मद सिराजने शेवटी दोन बळी घेऊन आफ्रिकेचा डाव १५३ धावांवर आटोपला.
भारताचा दुसरा डाव पत्त्यासारखा कोसळला
पहिल्या डावातील ३० धावांच्या आघाडीमुळे भारताला विजयासाठी फक्त १२४ धावांचे माफक लक्ष्य मिळाले होते. परंतु, धावांचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली. दक्षिण आफ्रिकेच्या मार्को जान्सेनने यशस्वी जैस्वाल आणि के.एल. राहुल या दोन्ही सलामीवीरांना स्वस्तात बाद केले. दुसऱ्या डावात भारताचा संपूर्ण फलंदाजी क्रम गडगडला आणि संपूर्ण संघ केवळ ९३ धावांवर ऑलआऊट झाला. यामुळे भारताला ३० धावांनी पराभव स्वीकारावा लागला.












Click it and Unblock the Notifications