IPL स्थगित होण्याची ही पहिलीच वेळ नाही, यापूर्वीही असं घडलयं, पण का?
बीसीसीआयने इंडियन प्रीमियर लीग २०२५ पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी झालेल्या आपत्कालीन बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बोर्डाने हा निर्णय घेतला आहे. गुरुवारीच, बीसीसीआयने धर्मशाळेत पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना मध्यावर थांबवण्याचे कठोर पाऊल उचलले होते.

भारत आणि पाकिस्तानमधील युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेता बीसीसीआयने इंडियन प्रीमियर लीगचा चालू हंगाम पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी झालेल्या बैठकीनंतर, बोर्डाने ही महत्त्वाची माहिती सर्वांना सांगितली. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, "देशात युद्ध सुरू असताना क्रिकेट सुरू आहे हे चांगले दिसत नाही."
आयपीएल दुसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आली
इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात ही दुसरी वेळ आहे जेव्हा चालू स्पर्धा पुढे ढकलावी लागली आहे. २०२१ च्या सुरुवातीला, जेव्हा कोरोना साथीने भारतात थैमान घातले होते, तेव्हा संघातील खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यानंतर आयपीएल पुढे ढकलण्यात आली होती. ९ एप्रिल २०२१ रोजी सुरू झालेली ही स्पर्धा ४ मे रोजी पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. आयपीएलच्या ६० पैकी उर्वरित ३१ सामने सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये यूएईमध्ये आयोजित करण्यात आले होते.
आयपीएल देशाबाहेर झाली
२००९ मध्ये होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या दुसऱ्या हंगामाचे आयोजन देशातील लोकसभा निवडणुकीमुळे बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकेत केले होते. २०१४ मध्येही असेच घडले होते. आयपीएल सुरू होताच निवडणुकीच्या तारखा जुळल्या आणि पहिले २० सामने संयुक्त अरब अमिरातीने आयोजित करण्यात आले होते.
पाकिस्तान सुपर लीग युएईला होणार
सध्या पाकिस्तानात पाकिस्तान सुपर लिग स्पर्धा सुरु आहेत. या स्पर्धा अठरा मे पर्यंत चालणार आहे. अठरा मे रोजी या स्पर्धेचा अंतीम सामना आहे. पण भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभुमीवर पाकिस्ताननेही त्यांची स्पर्धा दुबईत घेण्याचा निर्णय घेतला आहे.
दोन्ही देशातील संबंध तणावपूर्ण
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी तणावात तीव्र वाढ झाल्यानंतर आता दोन्ही देशातील संबंध तणावाचे आहेत या दोन्ही देशात लीग स्पर्धा सुरु होत्या. दोन्ही देशांनी या लीगसंदर्भात सुरक्षेच्या कारणावरुन ठोस निर्णय घेतले आहेत.
आयपीएलचे 16 सामने राहीले
आयपीएल स्पर्धाच अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे.त्यामुळे आयपीएलचे नियोजित सामने होणार नाहीत. आयपीएल सुरु झाल्यापासून काल 8 मेपर्यंत 58 सामने पार पडले आहेत. सध्या या स्पर्धेतील 16 सामने खेळणे बाकी आहे, साखळी स्पर्धेत प्रत्येक संघाला तेरा सामने खेळायचे असून बहुतांश संघांचे 10 ते 12 सामने पुर्ण झाले आहेत. प्लेऑफमध्ये अंतीम 4 संघात चुरस असताना हा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे.












Click it and Unblock the Notifications