गौतम गंभीर तातडीने भारतात परतणार; 'या' कारणामुळे गंभीरला भारतात परताव लागणार...
भारतीय संघाचा इंग्लंड दौरा 20 जूनपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेसह महत्त्वपूर्ण टप्प्यावर आहे. यावेळी संघात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांसारखे अनुभवी खेळाडू नसल्यामुळे नेतृत्व आणि मार्गदर्शनाची जबाबदारी युवा कर्णधार शुभमन गिल आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावर आहे. मात्र, गंभीर यांना त्यांच्या आईच्या प्रकृतीमुळे अचानक भारतात परतावं लागलं आहे.

आईच्या आजारामुळे तातडीने परतीचा निर्णय
मिळालेल्या माहितीनुसार, गौतम गंभीर यांच्या आई सीमा गंभीर यांना 11 जून रोजी हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची स्थिती चिंताजनक असल्याने सध्या त्या आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत. या घडामोडीची माहिती मिळाल्यानंतर गंभीर यांनी इंग्लंडमधील तयारी मोडीत काढत भारतात परतण्याचा निर्णय घेतला.
इंट्रा-स्क्वॉड मॅचमध्ये बदलाची शक्यता
13 ते 16 जून दरम्यान टीम इंडिया एक इंट्रा-स्क्वॉड सामना खेळणार असून या सामन्यातून कसोटी मालिकेसाठी अंतिम संघ निवडला जाणार आहे. गौतम गंभीर यांच्या अनुपस्थितीत आता या निवडीची जबाबदारी सपोर्ट स्टाफवर येणार आहे. प्रशिक्षकाचा अनुभव आणि उपस्थिती या टप्प्यावर महत्त्वपूर्ण मानली जात असल्यामुळे संघ व्यवस्थापनासाठी ही मोठी अडचण ठरू शकते.
परतण्याची शक्यता 17 जूनला
गंभीर केव्हा पुन्हा इंग्लंडमध्ये संघात सहभागी होतील, याबाबत सुरुवातीला स्पष्टता नव्हती. पण, नवीन माहितीनुसार, ते 17 जूनपर्यंत टीम इंडियामध्ये पुन्हा सहभागी होतील, अशी शक्यता आहे. त्यामुळे ते पहिल्या कसोटीपूर्वी संघात पुन्हा सहभागी होऊन अंतिम तयारीसाठी महत्त्वाची भूमिका निभावू शकतील.
गंभीरच्या अनुपस्थितीचा संघावर परिणाम?
गौतम गंभीर यांचं संघासोबत असणं केवळ रणनीतीसाठीच नव्हे, तर युवा खेळाडूंना आत्मविश्वास देण्यासाठीही अत्यंत गरजेचं मानलं जातं. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत संघाला अनुभवाची उणीव भासण्याची शक्यता आहे.
क्रीडारसिक आणि क्रिकेटप्रेमी गौतम गंभीर यांच्या आईच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, आणि ते लवकरच टीम इंडियासोबत इंग्लंड दौऱ्यात सहभागी व्हावेत, यासाठी प्रार्थना करत आहेत.












Click it and Unblock the Notifications