भारत-पाकिस्तानमध्ये क्रिकेट सामने होणार नाहीत? BCCI ने ICC ला लिहिले पत्र; आशिया कपचे काय होणार?
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संताप आहे. या हल्ल्यात २८ जणांना आपला जीव गमवावा लागला आणि १७ जण जखमी झाले. आता या हल्ल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयही अॅक्शन मोडमध्ये आले आहे. काही मिडिया वृत्तानुसार, बीसीसीआयने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) पत्र लिहले असून यापुढे पाकिस्तानविरुद्ध कोणतेही क्रिकेट खेळणार नसल्याचे कळविले असल्याचे सांगितले जात आहे.

काय म्हणते बीसीसीआय?
काही मिडिया हाऊसच्या म्हणण्यांनुसार बीसीसीआय यापुढे पाकिस्तानसोबत क्रिकेट मॅच खेळू इच्छित नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयसीसीला एक पत्र लिहिले आहे. त्यात अशी विनंती करण्यात आली आहे की, भविष्यात आयसीसीने जागतिक स्थरावरील क्रिकेट स्पर्धेत भारत व पाकिस्तानला एकाच गटात ठेऊ नये. भविष्यातील आयसीसीच्या स्पर्धेत भारत पाकिस्तानसोबत खेळू इच्छित नाही.
आशिया कपमध्ये काय होईल?
आयसीसीच्या टी-२० विश्वचषक स्पर्धा २०२६ मध्ये भारत व श्रीलंकेत आयोजित करण्यात येणार आहेत. त्यापूर्वी सप्टेंबरमध्ये आशिया कप स्पर्धाही होणार आहेत. या दोन्ही स्पर्धेत भारत व पाकिस्तानचे सामने तटस्थ ठिकाणी खेळविले जाणार आहेत. आयसीसी, पीसीबी आणि बीसीसीआयच्या जुन्या करारानुसार हे सामने त्रयस्थ ठिकाणी होतील. त्यामुळे आगामी या दोन्ही स्पर्धांचे सामने एकतर दुबईत होतील किंवा श्रीलंकेत होतील.
क्रिकेट विश्वातही संताप
पहलगान हल्ल्यानंतर क्रिकेट जगतातही संतापाची लाट उसळली. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला. त्यांनी म्हटले की, बीसीसीआय पीडित कुटुंबांसोबत आहे. भारताने पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणे थांबवावे का? असे विचारले असता त्यांनी स्पष्टपणे सांगितले की बीसीसीआय आधीच सरकारच्या सूचनांचे पालन करत आहे. राजीव शुक्ला म्हणाले, "आम्ही पाकिस्तानसोबत कोणतीही द्विपक्षीय मालिका खेळत नाही आणि भविष्यातही खेळणार नाही. जेव्हा आम्ही आयसीसी स्पर्धांमध्ये खेळतो तेव्हा ते आंतरराष्ट्रीय नियमांनुसार असते."
कसा आहे क्रिकेटचा इतिहास?
भारत आणि पाकिस्तानने शेवटची एकदिवसीय आणि टी२० मालिका २०१२-१३ मध्ये खेळली होती. जेव्हा पाकिस्तानने भारताचा दौरा केला होता. भारताने २००७ मध्ये पाकिस्तानमध्ये शेवटची कसोटी मालिका खेळली होती. अलीकडेच, भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानचा दौरा करण्यास नकार दिला, ज्यामुळे आयसीसीला स्पर्धेसाठी दुबईतील तटस्थ मैदानाचा निर्णय घ्यावा लागला.












Click it and Unblock the Notifications