Asia Cup 2025: कोणाला संधी, कसा असेल संघ, उप-कर्णधारपदाची गुंतागुंत, BCCIसमोर काय आहेत आव्हाने!
Asia Cup 2025 : या वर्षी 9 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशिया कप टी-20 स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळासमोर (BCCI) एक मोठे आव्हान उभे आहे. 17 खेळाडूंचा संघ निवडताना केवळ खेळाडूंचा फॉर्मच नव्हे, तर आगामी वेस्ट इंडिज कसोटी मालिकेचाही विचार करावा लागणार आहे.
चला, या स्पर्धेसाठी भारताचा संभाव्य संघ कसा असेल, यावर एक सविस्तर नजर टाकूया..!
फलंदाजीसाठी नवीन आणि जुन्या चेहऱ्यांमधील स्पर्धा
सूर्यकुमार यादव संघाचा कर्णधार असल्याने त्याचे स्थान निश्चित आहे. त्याच्यासोबत, टी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानी असलेले अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा यांची निवडही जवळपास निश्चित आहे. याव्यतिरिक्त, शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल आणि श्रेयस अय्यर यांच्यात उर्वरित फलंदाजीच्या स्थानासाठी चुरशीची स्पर्धा आहे. शुभमन आणि यशस्वीने आयपीएलमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली असली तरी, आगामी कसोटी मालिकेमुळे त्यांच्या निवडीवर प्रश्नचिन्ह आहे. जर त्यांना विश्रांती दिली गेली, तर रिंकू सिंग आणि रियान परागसारख्या युवा खेळाडूंना संधी मिळू शकते.

यष्टीरक्षकपदाचा तिढा: सॅमसन, जुरेल आणि इतर
संजू सॅमसन गेल्या एक वर्षातील त्याच्या कामगिरीमुळे यष्टीरक्षक म्हणून पहिली पसंती आहे. ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत, संजूला पर्याय म्हणून ध्रुव जुरेल, जितेश शर्मा आणि प्रभसिमरन सिंग यांच्यापैकी एकाची निवड केली जाऊ शकते. ध्रुव जुरेलला नुकत्याच झालेल्या मालिकेत संधी मिळाल्यामुळे तो शर्यतीत आघाडीवर आहे. इशान किशन आणि केएल राहुलसारखे वरिष्ठ खेळाडू देखील दावेदार आहेत, परंतु त्यांची फलंदाजीची शैली आणि टॉप-ऑर्डरमध्ये खेळण्याची सवय पाहता, त्यांची निवड फक्त पर्यायी यष्टीरक्षक म्हणून होण्याची शक्यता आहे.
अष्टपैलू खेळाडूंची किती आहेत ताकद!
प्रशिक्षक गौतम गंभीर अष्टपैलू खेळाडूंना अधिक महत्त्व देतात. त्यामुळे, हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल यांचे स्थान निश्चित आहे. यांच्यासोबतच शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर आणि नितीश कुमार रेड्डी यांचाही संघात समावेश केला जाऊ शकतो. हे पाचही खेळाडू फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये योगदान देऊ शकतात, ज्यामुळे संघाला चांगली खोली मिळेल.
बुमराहची वापसी आणि युवा गोलंदाजांना संधी
जसप्रीत बुमराहचे फिटनेस आणि पुनरागमन हे सर्वात महत्त्वाचे आहे. तो जर पूर्णपणे तंदुरुस्त असेल, तर त्याचे स्थान निश्चित आहे. अर्शदीप सिंगसोबत तो वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळेल. मोहम्मद सिराजला कामाच्या ताणामुळे विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे, ज्यामुळे प्रसिद्ध कृष्णा आणि हर्षित राणा यांना संधी मिळू शकते. फिरकी गोलंदाजीमध्ये अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर हे अष्टपैलू खेळाडू आहेतच. त्यांच्याशिवाय, कुलदीप यादव, रवी बिश्नोई आणि वरुण चक्रवर्ती यांच्यापैकी कोणाची निवड होते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. संघात किमान दोन स्पेशलिस्ट फिरकी गोलंदाज असण्याची शक्यता आहे.
उप-कर्णधारपदाची अनिश्चितता: शुभमन की अक्षर?
संघाच्या उपकर्णधारपदाची शर्यत शुभमन गिल आणि अक्षर पटेल यांच्यात आहे. शुभमनला यापूर्वी उपकर्णधारपद देण्यात आले होते, परंतु आशिया कपनंतर लगेचच वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिका सुरू होणार आहे, ज्यामध्ये तो कर्णधार असेल. त्यामुळे त्याला आशिया कपमधून विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, अक्षर पटेलला उपकर्णधारपद मिळू शकते.
कसा असेल भारतीय संभाव्य टीम?
सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, शुभमन गिल, ध्रुव जुरेल/जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रियान पराग, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा, जसप्रीत बुमराह.












Click it and Unblock the Notifications