काय आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, कसा मिळणार फायदा? जाणून घ्या…
मुंबई: उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी २८ जून शुक्रवारी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. काही नवीन महामंडळ स्थापन होणार असल्याचही अजित पवार यांनी यावेळी सांगितलं. मोठी चर्चा झालेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा अजित पवारांनी अर्थसंकल्प सादर करताना केली.
अर्थसंकल्प सादर करताना अजित पवार म्हणाले, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्त्वाकांक्षी आणि व्यापक योजनेची घोषणा मी करत आहे. महिलांचं आर्थिक स्वातंत्र्य, स्वावलंब, सर्वांगीण विकासासाठी या योजनेअंतर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये देण्यात येतील असे अजित पवारांनी सांगितले.

तसेच या योजनेसाठी दरवर्षी 46 हजार कोटींचा निधी दिला जाईल. जुलै 2024 पासून या योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात येईल अशी माहिती अजित पवार यांनी दिली. या योजनेअंर्तगत लाभार्थी महिलांना 1500 रुपये प्रति महिना दिले जातील. कमीतकमी 3.50 कोटी महिलांना फायदा होण्याची आशा आहे.
आधी मध्य प्रदेश अन् आता महाराष्ट्रात
मध्य प्रदेशमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मध्य प्रदेशमध्ये लाडकी बहीण योजना लागू केली होती. या योजनेची मोठी चर्चा झाली होती. या योजनेच्या माध्यमातून मध्य प्रदेशमधील गरीब महिलांना सरकारतर्फे आर्थिक मदत केली जाते.
शिवराजसिंह यांनी मध्य प्रदेशची विधानसभा निवडणूक या योजनेच्या जोरावर जिंकली असे बोलले जाते. महिला मतदारांनी त्यांना भरभरून मतं दिली होती. त्यानंतर आता लोकसभा निवडणुकीतही येथे भाजपने 29 पैकी 29 जागांवर विजय मिळवला आहे.
महाराष्ट्रातही महिला वर्गाला आकर्षित करण्यासाठी ही योजना लागू झाल्याचे बोलले जात आहे. याचा फायदा आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला होऊ शकतो.
कुणाला मिळणार योजनेचा लाभ?
21 ते 60 या वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. ज्यांचे वार्षिक उत्पन्न 2,50,500 रुपयांपेक्षा कमी आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. जुलै २०२४ पासून ही योजना महाराष्ट्रात लागू होईल. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांना दरमहा १५०० रुपये मिळतील.
दरम्यान, इतरही अनेक महत्त्वाच्या योजनांच्या घोषणा अजित पवारांनी अर्थसंकल्प सादर करताना केल्या. राज्यात अनेक नवीन महामंडळं स्थापन होणार असल्याचेही ते म्हणाले. विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर असताना सादर झालेल्या अर्थसंकल्पात मोठ्याप्रमाणात घोषणा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या घोषणांचा महायुतीला कशाप्रकारे फायदा होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.












Click it and Unblock the Notifications