वर्धा जिल्हा हादरला: भरधाव कारच्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघे ठार; 6 वर्षांच्या मुलाची मृत्यूशी झूंज
Wardha Tragedy Speeding Car : वर्धा-सेलूकाटे मार्गावर सोमवारी (२४ नोव्हेंबर २०२५) रात्री घडलेल्या एका भीषण अपघाताने सेलूकाटे परिसरावर काळाने झडप घातल्याचे दुःखद चित्र आहे. नवोदय विद्यालयाजवळ भरधाव वेगाने आलेल्या चारचाकी वाहनाने एका दुचाकीला जोरदार धडक दिली, यात एका सुखी कुटुंबातील पती, पत्नी आणि त्यांच्या मोठ्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत कुटुंबातील सहा वर्षांचा लहान मुलगा गंभीर जखमी असून तो सध्या जीवन-मरणाच्या लढाईत आहे.

एका क्षणात भोयर कुटुंब उद्ध्वस्त
या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेत सेलूकाटे येथील भोयर कुटुंबाचा संसारच उद्ध्वस्त झाला आहे. अपघातात मृत पावलेल्यांमध्ये यांचा समावेश आहे: सोमनाथ भोयर (वय ३८, वडील), निकिता सोमनाथ भोयर (वय ३२, आई), पूरब सोमनाथ भोयर (वय १२, मोठा मुलगा) या भीषण धडकेत तिघांचाही जागीच मृत्यू झाला. तर, त्यांचा लहान मुलगा कान्हा भोयर (वय ६) हा गंभीर जखमी झाला आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कान्हाची प्रकृती अत्यंत नाजूक असून त्याच्यावर सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात तातडीने उपचार सुरू आहेत.
गणेशनगराहून परतताना मृत्यूचा सापळा
प्राथमिक माहितीनुसार, भोयर कुटुंब वर्धा गणेशनगर येथील एका कार्यक्रमाहून रात्रीच्या वेळी आपल्या सेलूकाटे येथील घरी दुचाकीवरून परतत होते. याचवेळी वायगाव येथील एका भरधाव चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीचे अक्षरशः तुकडे झाले. धडक दिल्यानंतर चारचाकी चालक तातडीने घटनास्थळावरून फरार झाला. हे वाहन वायगाव येथील असल्याचे निष्पन्न झाले आहे.
संताप आणि प्रशासनावर प्रश्नचिन्ह
अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. उपस्थित नागरिकांनी तातडीने जखमी कान्हाला सावंगी रुग्णालयात हलवले, मात्र उर्वरित कुटुंबियांना वाचवण्याचे त्यांचे प्रयत्न अपयशी ठरले. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून सेलू आणि काटे गावात हळहळ व्यक्त होत आहे. अचानक एका कुटुंबाचा आधार कायमचा गेल्याने सर्वत्र गंभीर दुःख आहे. स्थानिक नागरिकांनी भरधाव आणि बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्या चालकांविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला आहे.
नागरिकांनी काय केली मागणी?
वर्धा-सेलूकाटे मार्गावर गेल्या काही महिन्यांपासून अपघातांची संख्या वाढली आहे. वाहतूक पोलिसांनी तातडीने या मार्गावर वेगमर्यादा आणि तपासणी सुरू करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे असे अपघात वाढत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. सावंगी पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला असून फरार झालेल्या चारचाकी चालकाचा शोध घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.












Click it and Unblock the Notifications