आम्हाला सत्तासंघर्ष प्रकरणी न्याय मिळेल असे वाटत नाही- सरन्यायाधीश-PM भेटीवरुन संजय राऊतांचं वक्तव्य
Sanjay Raut criticizes CJI Chandrachud PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायधीश चंद्रचूड यांच्या निवासस्थानी गणपती पूजनासाठी गेले. त्यावरुन शिवसेना युबीटी नेते तथा खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर टीका करत सरन्यायधीश चंद्रचूड यांचे जर पंतप्रधानांसोबत मित्रत्व असेल तर त्यांनी महाराष्ट्राशी निगडीत सत्तासंघर्षाच्या खटल्यातून स्वतःला बाजूला व्हायला हवं असं म्हटलं आहे.
न्यायालयात एखादा खटला चालू असेल आणि त्या खटल्याशी संबंधित व्यक्तीशी काही नातं जर न्यायाधीशांचे असते तर स्वतःहून न्यायाधीश संबंधित खटल्यातून बाजूला होत असतात हा संकेत असतो असा संदर्भही संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना आज दिली.

दिल्लीत अनेक गणपती पण पीएम गेले नाही
संजय राऊत म्हणाले, "गणपती उत्सव सुरू आहे, लोक एकमेकांच्या घरी भेट देतात. पंतप्रधानांनी आतापर्यंत किती घरांना भेट दिली याबद्दल माझ्याकडे माहिती नाही. दिल्लीत महाराष्ट्र सदन आहे, अनेक लोकांच्या घरी गणेशोत्सव साजरा केला जात आहे, महाराष्ट्र मंडळाचाही गणपती आहे पण त्यांच्याकडे ते गेलेले नाहीत."
#WATCH | On PM Modi visiting CJI DY Chandrachud's residence for Ganpati Poojan, Shiv Sena (UBT) leader Sanjay Raut says, " Ganpathi festival is going on, people visit each other's houses. I don't have info regarding how many houses PM visited so far...but PM went to CJI's house… pic.twitter.com/AVp26wl7Yz
— ANI (@ANI) September 12, 2024
...तर लोकांच्या मनात शंका येऊ शकते
संजय राऊत म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी सरन्यायाधीशांच्या घरी गेले आणि त्यांनी एकत्र 'आरती' केली. आमची शंका एवढी आहे, की राज्यघटनेचे रखवालदार जर राजकारण्यांना भेटला तर लोकांच्या मनात शंका निर्माण होऊ शकते. महाराष्ट्रात घटनाबाह्य सरकार जे बसले त्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात केस आहे. त्याची सुनावणी सरन्यायाधीशांसमोरच सुरु आहे. त्यामुळे आम्हाला न्याय मिळेल की नाही याबद्दल शंका आहे."
खटल्यात केंद्र सरकार पार्टी
संजय राऊत म्हणाले, "सर्वोच्च न्यायालयात जे प्रकरण आहे त्यात केंद्र सरकार यांनाही पार्टी केलेले आहे. त्यात केंद्र सरकारचे प्रमुख अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सरन्यायाधीशांच्या घरी बसतात. त्यामुळे सरन्यायधीशांनी आता सर्वोच्च न्यायालायात सुरु असलेल्या प्रकरणातून बाजूला व्हायला हवं."
आम्हाला न्याय देऊ शकेल का?
संजय राऊत म्हणाले, "कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात एक पार्टी आहेत आणि ते खुलेआम सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायधीशांसोबत दिसत आहेत ज्या सरन्यायधीशांकडे या सत्तासंघर्षाची सुनावणी सुरु आहे. यामध्ये चंद्रचूड साहेब आम्हाला न्याय देऊ शकेल का.. कारण तीन तारखेपासून तारीखवर तारीख मिळत आहे."
शिवसेनेला न्याय मिळेल असे वाटत नाही
संजय राऊत म्हणाले, "महाराष्ट्रात बेकायदेशीर सरकार चालवली जात आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीसारख्या पक्षांना ज्या पद्धतीने फोडले गेले त्यात आम्हाला न्याय मिळत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातील बेकायदेशीर सरकारला वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत न्याय देण्याची जबाबदारी ज्या सरन्यायधीशांवर आहे, त्यांच्यासोबत जर मित्रत्व आणि नातं असेल तर महाराष्ट्राच्या मनात एक शंका येईल की, शिवसेनेला न्याय मिळेल असे वाटत नाही."
खटल्यापासून चंद्रचूड यांनी बाजूला व्हावं..
संजय राऊत म्हणाले, "अशा परिस्थितीत कोणता पक्ष असेल आणि न्यायधीशांचे त्यांच्याशी काही नातं असेल तर ते स्वतः संबंधित खटल्यापासून स्वतःला वेगळे करतात तसंच चंद्रचूड साहेबांनीही शिवसेनेच्या सत्तासंघर्ष प्रकरणातून बाजूला करायला हवे. "












Click it and Unblock the Notifications