लाचारीचे राजकारण: 'बाबा मला मारले' म्हणत एक जण दिल्लीला गेलं?; उद्धव ठाकरेंचा शिंदेंना टोला!
Uddhav Thackeray slams Eknath Shinde : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी महाराष्ट्राच्या राजकारणावर आणि सध्याच्या सत्ताधारी महायुतीतील तणावावर आपल्या खास शैलीत भाष्य केले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावरून त्यांनी थेट टीकास्त्र सोडले. तसेच, सध्याचे राजकारण 'रेवडी संस्कृती' आणि पक्ष फोडण्यावर केंद्रित झाल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेकडून आयोजित डिजिटल बोर्ड वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.

'दिवट्यांना मशालीचे महत्त्व कळणार नाही'
उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात शिक्षण आणि शिक्षकांचे महत्त्व सांगून केली. चांगले शिक्षण मिळाले नाही तर काय होते, हे सांगताना त्यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले. "दिवटी म्हणजे मशाल आणि दिवटा म्हणजे... त्यामुळे असे जे काही दिवटे निघालेत त्यांना मशालीचे महत्त्व कळणार नाही आणि समजणारही नाही. ही मराठी भाषेची गंमत आहे." या वक्तव्यातून त्यांनी शिवसेनेचे (उबाठा) निवडणूक चिन्ह असलेल्या मशाल चिन्हाचे महत्त्व अधोरेखित करत, शिंदे गटातील नेत्यांवर थेट टीका केली.
लाचारीचे राजकारण: 'बाबा मला मारले'
सध्या महायुतीमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत कुरघोडीवर आणि एकमेकांच्या आर्थिक नाड्या आवळण्याच्या राजकारणावरही उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले. "आता कहर म्हणजे, त्यांच्यातच एकमेकांच्या नसा आवळण्याचे काम सुरू झाले आहे. एक कुणीतरी गेलंय 'बाबा मला मारले' म्हणून दिल्लीला. ही लाचारी का? तर तेच की, त्या वयात चांगले शिक्षक मिळाले असते तर ही वेळ आलीच नसती." शिंदे गटाचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलीकडेच घेतलेल्या दिल्ली दौऱ्याचा संदर्भ देत त्यांनी ही टीका केली. महायुतीमधील तणावामुळे शिंदे यांना तक्रारी घेऊन दिल्लीत जावे लागले, याला त्यांनी 'लाचारी' असे संबोधले.
संस्कार आणि घराणेशाहीची व्याख्या
शालेय शिक्षण पूर्ण करू न शकलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि प्रबोधनकार ठाकरे यांचा उल्लेख करत त्यांनी संस्कारांचे महत्त्व सांगितले. शाळा सुटली तरी त्यांचे शिक्षण थांबले नाही, कारण घरात संस्कार नावाचा विषय असतो. आई-वडील स्वतःच्या वागणुकीतून मुलांना संस्कार देतात. या संस्कारांवरून त्यांनी 'घराणेशाही'वर होणाऱ्या टीकेलाही उत्तर दिले. "वडिलांनी एवढा घोटाळा केला की, मुलगा आणखी मोठा घोटाळा करणार," ही घराणेशाही असते, असे सांगत त्यांनी भाजप आणि त्यांच्या सहकारी पक्षांतील नेत्यांना टोला लगावला.
चांगल्या लोकांना देशद्रोही ठरवणे
उद्धव ठाकरे यांनी यावेळी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या अटकेवरून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवरही निशाणा साधला. "आपल्या देशात चांगले शिक्षक व शिक्षण मिळाले नाही, तर चांगल्या लोकांना सुद्धा देशद्रोही ठरवून तुरुंगात टाकले जाते याचे सोनम वांगचुक हे उत्तम उदाहरण आहे." त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून, 'नको तो शिक्का मारून' त्यांना तुरुंगात डांबले जात असल्याबद्दल त्यांनी तीव्र खेद व्यक्त केला.
'दुसरा देईल ती रेवडी आणि आम्ही करू ते उपकार'
राजकारणात वाढत असलेल्या 'रेवडी संस्कृती'वर आणि भाजपच्या दुटप्पी धोरणावरही त्यांनी टीका केली. "निवडणुकीच्या दिवसांत आता रेवडी सरसकट झाली आहे. म्हणजे दुसरा देईल ते रेवडी आणि आम्ही करू ते उपकार," असे आत्ताचे राजकारण आहे. शिक्षण क्षेत्राकडे दुर्लक्ष करण्याबद्दल त्यांनी सरकारवर टीका केली. सरकारला पक्ष फोडण्यात आणि आमदार-खासदार फोडण्यात जास्त रस आहे, अशी टीका त्यांनी केली.












Click it and Unblock the Notifications