विधान परिषदेच्या चार जागांचा आज निकाल, कोण मारणार बाजी?
मुंबई: लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात २६ जून रोजी विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधरच्या चार मतदारसंघात मतदान पार पडलं होतं. या चार मतदारसंघाचा निकाल आज १ जुलै सोमवारी जाहीर होणार आहे. या चारही मतदारसंघात अटीतटीचा सामना होत असून उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
लोकसभा निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे यश न मिळालेल्या महायुतीतील घटक पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केलेली होती. लोकसभेतील पराभवाचा वचपा काढून विधानसभेसाठी रणशिंग फुंकण्याची संधी महायुतीकडे या निवडणुकीच्या निमित्ताने होती.

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी पसंतीक्रमाने मतदान झाले होते. विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक आणि नाशिक विभागीय शिक्षक या चार जागांच्या निवडणुकीसाठी २६ जून रोजी मतदान झाले होते. या निवडणुकीची मतमोजणी आज १ जुलैला होऊन निकाल जाहीर केले जाणार आहेत.
नाशिक मतदारसंघात चौरंगी लढत
नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघात मुख्य लढत ही शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे, उद्धव ठाकरे गटाचे संदीप गोपाळराव गुळवे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे महेंद्र भावसार आणि अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्यात आहे.
विशेष म्हणजे येथे सत्ताधारी महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे उमेदवार आमनेसामने उभे आहेत. भाजपने शिंदे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघात ६९ हजारांहून अधिक मतदार आहेत.
मुंबईत ५ उमेदवारांमध्ये टफ फाईट
मुंबई विभागीय शिक्षक मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाचे ज. मो. अभ्यंकर, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शिवाजीराव नलावडे, भाजपचे शिवनाथ दराडे आणि शिवसेना शिंदे गटपुरस्कृत शिवाजी शेंडगे आणि समाजवादी गणराज्य पक्षाचे सुभाष मोरे हे पाच प्रमुख उमेदवार आहेत. या मतदारसंघात एकूण १५ हजार ८३९ मतदार आहेत.
कोकणमध्ये भाजप आणि काँग्रेस आमनेसामने
कोकण विभागीय पदवीधर मतदारसंघात भाजपचे निरंजन डावखरे आणि काँग्रेसचे रमेश कीर यांच्यात सरळ लढत होत आहे. निरंजन डावखरे हे तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघातील भाजपची यंत्रणा लक्षात घेता काँग्रेससाठी ही निवडणूक सोपी नाही. या मतदारसंघात एकूण २ लाख २३ हजार २२५ मतदारांची नोंद झाली आहे. या गटात एकनाथ शिंदे यांनीही भाजपच्या मागे मोठी ताकद उभी केली आहे.
मुंबई पदवीधरमध्ये भाजप आणि ठाकरेंचे शिलेदार समोरासमोर
मुंबई पदवीधरमध्ये एकूण आठ उमेदवार रिंगणात असून मुख्य लढत ठाकरे गटाचे अनिल परब आणि भाजपचे किरण शेलार यांच्यात होणार आहे. मुंबईतील १ लाख २० हजार ६७३ मतदार अनिल परब आणि किरण शेलार यांचे भवितव्य निश्चित करतील. दोन्ही पक्षांनी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केलेली आहे.
देवेंद्र फडणवीसांनी या निवडणुकीत विशेष लक्ष घातले होते. तर अनिल परब हे उद्धव ठाकरेंचे अतिशय जवळचे सहकारी असल्याने उद्धव ठाकरेंसाठीही ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे.
-
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता! -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं?








Click it and Unblock the Notifications