राज्यात लग्नापुर्वी 'ही' चाचणी होऊ शकते बंधनकारक! विधिमंडळात आरोग्य राज्यमंत्री काय म्हणाल्या? वाचा
Thalassemia test may become mandatory before marriage : राज्यात बारा हजार आठशे इतके थॅलेसिमिया रुग्ण असून हा गंभीर आजार आहे, त्यामुळे त्यांच्यापासून जन्मलेल्या मुलांमध्ये हा आजार येऊ शकतो, त्यामुळे लग्नापुर्वी थॅलेसिमियाआजाराची चाचणी बंधनकारक करु असे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी म्हटले आहे.
विधीमंडळ अधिवेशनाच्या आजच्या दिवशी प्रश्नोत्तरांच्या तासात त्यांना याविषयी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्या बोलत होत्या. विधीमंडळात विकास ठाकरे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राज्यात विवाहपूर्व थालेसीमिया रोगाची चाचणी करणं बंधनकारक करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले.

राज्यात बारा हजार आठशे थॅलेसिमिया रुग्ण- बोर्डीकर
राज्यात बारा हजार आठशे इतके थालेसीमिया रुग्ण असून हा गंभीर आजार आहे, त्यामुळे त्यांच्यापासून होणाऱ्या संततीत तो येऊन त्याचे गांभीर्य वाढेल हे लक्षात घेऊन एक पाऊल थालेसीमिया मुक्तीच्या दिशेने हे अभियान राबविण्यात येत आहे. परभणीत यासाठी एक पायलट प्रकल्प राबविण्यात आला आहे, तो राज्यभर लागू करण्यात येत आहे असं बोर्डीकर
म्हणाल्या.
थॅलेसिमियाचे प्रत्येक जिल्ह्यात उपचार केंद्र
यावेळी प्रश्नाचे उत्तर देताना सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी प्रत्येक जिल्ह्यात या रोगाची उपचार केंद्र सुरू करण्यात येतील असेही सांगितले. याबाबतचे उपप्रश्न राहुल पाटील, अमित देशमुख, महेश शिंदे, रणधीर सावरकर आदींनी विचारले. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
वाहन खरेदी घोटाळ्याच्या आरोपाची चौकशी सुरु
कॅन्सर निदान करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या वाहनांच्या खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाला असल्याच्या आरोपाची चौकशी आरोग्य विभागाच्या आयुक्तांकडून करण्यात येत आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिली, या चौकशीचा अहवाल हे अधिवेशन संपण्यापूर्वी सभागृहात सादर करा अशी सूचना अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यावेळी दिल्या. याबाबतचा मूळ प्रश्न भास्कर जाधव यांनी उपस्थित केला होता,त्यावर विजय वडेट्टीवार यांनी उपप्रश्न विचारले. टाटा कंपनीच्या अद्ययावत वाहनापेक्षा दुप्पट रकमेनं या वाहनांची खरेदी झाली असा आरोप भास्कर जाधव यांनी केला होता.
दोन महिन्यात बंद सीटीस्कॅन, एमआरआय सेवा सुरु होणार
राज्यात जिथे जिथे सिटी स्कॅन आणि एम आर आय यंत्रांचा तुटवडा आहे अथवा बंद आहेत तिथे येत्या दोन महिन्यात ती कार्यान्वित केली जातील अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. याबाबतचा मूळ प्रश्न संजय पोतनीस यांनी विचारला होता.
जिल्हा विकास निधीतून यासाठी एक विशिष्ट निधी उपलब्ध करून द्यावा अशी सूचना अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यावेळी केली, त्यावर याआधीचा याबाबतचा अनुभव चांगला नाही , मात्र तरीही चांगल्या कंपन्यांची यंत्रे खरेदी करण्यासाठी त्यांचे दर ठरवून दिले जातील आणि तशी परवानगी दिली जाईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर दिली.












Click it and Unblock the Notifications