मोठी बातमी ! तहव्वूर राणाची चौकशीत धक्कादायक कबुली
26/11 च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार तहव्वूर राणा सध्या NIA (राष्ट्रीय तपास यंत्रणा) च्या ताब्यात असून, चौकशीत त्याने अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रँचने राणाची कसून चौकशी सुरू केली असून, या तपासात राणाने कबूल केले की तो पाकिस्तानच्या लष्कराचा एक विश्वासू एजंट होता. सध्या तो कॅनडाचा रहिवासी असून, एप्रिल 2025 मध्ये अमेरिकेने त्याला भारताच्या ताब्यात दिले.

राणाची कबुली: "गल्फ वॉरदरम्यान मी सौदी अरेबियात पाक लष्करासाठी तैनात होतो"
राणाने चौकशीत सांगितले, "मी पाकिस्तान आर्मीचा एजंट होतो आणि गल्फ वॉरदरम्यान सौदी अरेबियात तैनात होतो." त्याच दरम्यान त्याचा संपर्क डेव्हिड कोलमन हेडलीशी झाला. हेडलीने लष्कर-ए-तैयबाच्या अनेक दहशतवादी प्रशिक्षण शिबिरांमध्ये सहभाग घेतल्याची माहितीही त्याने दिली.
मुंबईत बनावट ऑफिस उघडून हल्ल्याची योजना
राणाने कबुली दिली की, त्याच्या इमिग्रेशन बिझनेसच्या माध्यमातून त्याने हेडलीला मुंबईत एक बोगस ऑफिस सुरू करण्यास मदत केली. हेडलीने त्या ऑफिसचा वापर 26/11 हल्ल्याचा कट आखण्यासाठी केला. मुंबई क्राइम ब्रँचकडे दिलेल्या जबाबात, राणाने या कार्यालयाचा हल्ल्याशी थेट संबंध असल्याचे मान्य केले आहे.
"2005 पासून हल्ल्याचा कट सुरू होता; हल्ल्याच्या दिवशी मी मुंबईतच होतो"
NIA च्या सूत्रांनुसार, राणाने कबूल केले आहे की, "2005 पासून पाकिस्तानमधील सूत्रधारांच्या मदतीने मुंबईवरील हल्ल्याची योजना आखली जात होती. जेव्हा 26/11 चा हल्ला झाला, त्यावेळी मी स्वतः मुंबईत होतो."
दिल्लीसह इतर शहरांचाही होता लक्ष्य
NIA विशेष न्यायालयाच्या मते, चौकशीतून हेही स्पष्ट झाले आहे की केवळ मुंबईच नव्हे तर दिल्लीसह इतर मोठ्या शहरांनाही लक्ष्य करण्याचा प्लॅन तयार करण्यात आला होता. राणाची माहिती या मोठ्या कटाचा पर्दाफाश करू शकते.
पुरावे: ईमेल, प्रवास, संवादांचा अभ्यास
राणावर गुन्हेगारी कट, हत्या, आणि दहशतवादाशी संबंधित गंभीर आरोप आहेत. चौकशीदरम्यान त्याचं आणि हेडलीचं ईमेलद्वारे झालेलं संभाषण, प्रवासाचे तपशील, आणि इतर डिजिटल पुरावे तपासले जात आहेत.
"राणाच्या कबुलीमुळे पाकिस्तानचा सहभाग अधोरेखित होतो" - उज्ज्वल निकम
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, "राणाची कबुली आणि प्रत्यार्पणामुळे पाकिस्तानचा 26/11 हल्ल्यातील सहभाग स्पष्ट होईल. हा तपशील जागतिक स्तरावर भारतासाठी महत्त्वपूर्ण पुरावा ठरेल."
26/11 हल्ल्यात 166 नागरिक ठार
26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर झालेल्या या भयावह हल्ल्यात 166 निष्पाप नागरिकांचा मृत्यू, तर 300 हून अधिक लोक जखमी झाले होते. हा हल्ला भारतावरचा सर्वात मोठा शहरी दहशतवादी हल्ला मानला जातो.












Click it and Unblock the Notifications