जे होईल ते होईल... प्राजक्ता माळी प्रकरणावर सुरेश धसांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले...
प्राजक्ता माळी प्रकरणानंतर आता पुन्हा आ. सुरेश धस आक्रमक झाले आहेत. आज त्यांनी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची भेट घेतली. त्यांच्याशी बंदुकीच्या परवान्याविषयी त्यांनी चर्चा केली. तेथून बाहेर आल्यावर प्रसारमाध्यमांनी त्यांना प्राजक्ता माळीबाबत प्रश्न विचारला मात्र त्यांनी थोडक्या शब्दात या प्रश्नाचं उत्तर दिलं.

प्राजक्ता माळीबाबत म्हणाले
अभिनेत्री प्राजक्ता माळीने सुरेश धस यांच्याविरोधात पत्रकार परिषद घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. धस यांनी माफी मागावी, अशी मागणीही प्राजक्ता माळी यांनी केली होती. याबाबत सुरेश धस यांना पत्रकारांनी विचारले. त्यावर धस म्हणाले, हा विषय माझ्यासाठी संपला आहे. जे होईल, ते मी पाहून घेईल. मात्र हा विषय पुन्हा घेऊ नका. संतोष देशमुख प्रकरणातून लक्ष डायव्हर्ट करण्याचा प्रकार होऊ देऊ नका. माझ सध्या सगळं लक्ष संतोष देशमुखांचे मारेकरी पकडण्यावर आहे. त्यामुळे तोच तोच विषय पु्न्हा आणू नका...
काय म्हणाले सुरेश धस
जिल्हाधिकाऱ्यांना भेटल्यावर धस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, बीड जिल्ह्यात भाजीपाला आणि फुटाणे विकतात तसे बंदुकीचे परवाने वाटले आहेत. लग्नात, लक्ष्मीपूजनला, ढाब्यावर सर्रास ठाँय-ठाँय वाजवलं जातंय. हे सगळे परवाने रद्द करावेत, या मागणीसाठी मी आज जिल्हाधिकाऱ्यांशी बोललोय. हे परवाने कुणाच्या काळात दिले व त्याला कुणाची शिफारस होती, याची माहिती मी मागवलीय. परवाने रद्द झाले नाही तर मी जिल्हाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही करणार असल्याचे धस यांनी सांगितलं.
बंदुकींसाठी शिफारस कुणाची
आ. सुरेश धस म्हणाले, बीड जिल्ह्यात सर्रास बंदुकांचे परवाने दिलेत. एवढे परवाने तर मुंबईतही नाहीत. हे परवाने कोणत्या अधिकाऱ्यांच्या काळात दिले व त्यासाठी शिफारस कुणाची होती, ही माहिती मी मागविली आहे. शिफारस करणाऱ्यांवरही कारवाई व्हायला हवी. मी कुणाची शिफारस केली असेल तर माझ्यावरही कारवाई करा, अशी माझी मागणी आहे. १०५ बंदुक परवाने रद्द केले आहेत. १०-१५ परवाने हे बँकांचे आहेत. मात्र उरलेल्या परवान्यांची चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी आहे, असंही धस यांनी स्पष्ट केलं.












Click it and Unblock the Notifications