मोठी बातमी: शिवसेना नाव व चिन्हाचा वाद अंतिम टप्प्यात! ऑगस्टमध्ये सुप्रीम कोर्ट लावणार सोक्षमोक्ष?
Shivsena name and symbol dispute Supreme Court Hearing : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या दोन वर्षांपासून धुमाकूळ घालत असलेल्या शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादावर आता सर्वोच्च न्यायालय लवकरच पडदा टाकण्याची शक्यता आहे. ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील हा कायदेशीर लढा आता निर्णायक वळणावर येऊन ठेपला आहे. सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान, न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावला जाईल आणि ऑगस्टमध्येच पुढील सुनावणीची तारीख दिली जाईल, असे स्पष्ट केले. त्यामुळे, शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह नेमके कोणाला मिळणार, याचा अंतिम निर्णय येत्या काही महिन्यांत लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

'आता नवीन अर्ज नको, प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावायचाय!'
सोमवारी झालेल्या सुनावणीत न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी ठाकरे गटाला उद्देशून एक महत्त्वाचे विधान केले. "या प्रकरणाला आता दोन वर्षे झाली आहेत. त्यामुळे आता नव्याने अर्ज करणे बंद करा. हे प्रकरण दोन वर्षांपासून प्रलंबित आहे आणि आता याची मुख्य सुनावणी ऑगस्ट महिन्यात घेऊ," असे न्यायमूर्तींनी ठामपणे सांगितले. यावरून, सर्वोच्च न्यायालय या प्रकरणाचा जलदगतीने निपटारा करण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
दोन्ही गटांकडून दिग्गज वकिलांचा युक्तिवाद
या सुनावणीदरम्यान, दोन्ही गटांकडून दिग्गज वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. शिवसेना शिंदे गटाकडून ज्येष्ठ वकील मुकूल रोहतगी आणि नीरज किशन कौल यांनी बाजू मांडली. तर ठाकरे गटाकडून रोहित शर्मा आणि कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी मुख्य सुनावणी सुरू करण्याचे सांगितल्यावर कपिल सिब्बल यांनी ऑगस्ट महिन्यातील तारखेची मागणी केली. तेव्हा न्यायमूर्तींनी आपले वेळापत्रक तपासून सुनावणीची तारीख लवकरच कळवणार असल्याचे सांगितले.
महानगरपालिका निवडणूक, अंतिम निकाल: काय असेल समीकरण?
या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांनी काही माध्यमांशी संवाद साधताना महत्त्वाचे संकेत दिले. सर्वोच्च न्यायालय ऑगस्टमध्ये शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतच्या खटल्याची मुख्य सुनावणी घेण्यास तयार आहे. मात्र, ती सुनावणी पूर्ण होईपर्यंत महानगरपालिका निवडणुका येऊ शकतात. अशा परिस्थितीत, सर्वोच्च न्यायालय हा निर्णय तात्पुरता राखून ठेवण्याची शक्यता आहे. परंतु, निवडणुका संपल्यानंतर म्हणजेच २०२५ हे वर्ष संपण्यापूर्वी शिवसेना पक्षासंदर्भात अंतिम निकाल सुनावला जाऊ शकतो, असे संकेत त्यांनी दिले.
शिंदे गटाचा दावा आणि न्यायालयाचे स्पष्ट संकेत
शिंदे गटाच्या वकिलांनी न्यायालयात असा युक्तिवाद केला की, ठाकरे गट दोन वर्षांपासून 'झोपा काढत होता' आणि त्यांनी या प्रकरणात काहीच केले नाही. यावर सर्वोच्च न्यायालयाने, "दोन वर्षे झाली आहेत आणि आता आम्हाला याचा कधी ना कधी सोक्षमोक्ष लावावाच लागेल," असे म्हणत लवकरच अंतिम सुनावणी घेण्याचे संकेत दिले. ऑगस्टमध्ये एक ते दोन दिवसांत यावर युक्तिवाद होतील आणि त्यानंतर निकाल राखून ठेवला जाईल, असाही अंदाज वर्तवला जात आहे.
या सर्व घडामोडींमुळे, आता शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडेच राहणार की परत उद्धव ठाकरे यांना मिळणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा देणारा ठरेल हे निश्चित!












Click it and Unblock the Notifications