Shivaji Maharaj Punya Tithi:शिवरायांच्या जीवनकार्यावर आधारीत विद्यार्थ्यांसाठी 4 उपयुक्त भाषणं वाचा
Shivaji Maharaj Punya Tithi 2025 : छत्रपती शिवाजी महाराज समस्त महाराष्ट्रच काय भारताचे आराध्य दैवत, पराक्रमी राजा, लोकशाहीचा उद्गगाता, स्वराज्याचे निर्माणकर्ते हिंदवी स्वराज्य संस्थापक अशा एक ना अनेक बिरुदावली त्यांच्यासाठी कमीच. त्यांच्या अफाट कार्यापुढे आपली मानही नतमस्तक होते. हिंदवी स्वराज्या स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची 3 एप्रिल 2025 रोजी पुण्यतिथी आहे.
अशा या थोर राजांचा मृत्यू 3 एप्रिल 1680 साली किल्ले रायगडावर झाला. यंदा शिवरायांचा 345 वा स्मृतिदिन आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार अनादी काळापर्यंत सर्वांना प्रेरित करत राहतील. शिवरायांचा विचार लहान मुलांमध्ये आणि तरुणाईत रुजवण्यासाठी भाषण आणि पुस्तक ही प्रभावी माध्यमं असतात. त्यामुळेच आम्ही इथे शिवरायांच्या जीवनकार्यावर आधारीत 4 छोटेखानी भाषणं देत आहोत, ज्याचा उपयोग मुलं आणि तरुणाईला भाषण देण्यासाठी होईल.

1. शिवरायांचे भाषाविषयक कार्य
प्रिय विद्यार्थी मित्रहो..
आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचे भाषाविषयक कार्य जाणून घेणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याचे संस्थापक होते. त्यांचा जन्म शिवनेरी गडावर झाला होता. मातृभुमी आणि मातृभाषा मराठीसाठी त्यांचे मोठे योगदान आहे. शिवरायांच्या काळात राज्यकारभारात पारशी भाषेचा मोठ्या प्रमाणात वापर होत असे. पण शिवरायांनी यात महत्त्वाचे बदल केले. शिवरायांनी आपल्या अधिकाऱ्यांची एक समिती नेमली. या समितीकडे पारशी व अरेबिक शब्दांऐवजी वापरता येण्यासारखे संस्कृत शब्द सुचवण्याची जबाबदारी देण्यात आली होती. या समितीने 1677 मध्ये 'राज्यव्यवहारकोष' नावाचा शब्दकोश सादर केला. शिवरायांची राजमुद्रादेखील संस्कृतमधेच होती.
जय शिवराय..
2. शिवरायांचे धर्मविषयक धोरण
प्रिय विद्यार्थी मित्रहो..
आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मविषयक धोरण जाणून घेणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्मनिरपेक्ष व सहिष्णु वृत्तीने राज्यकारभार चालवला. विविध धर्मांतील समन्वयावर त्यांचा विश्वास होता. जेव्हा औरंगजेबने जिझिया कर आकारण्यास सुरुवात केली तेव्हा शिवरायांनी एका पत्राद्वारे जिझिया कर रद्द करण्याचे सांगत औरंगजेबला त्यांनी अकबराप्रमाणे हिंदू धर्मातील श्रद्धा आणि क्षेत्रांबद्दल आदराने वागण्याचा सल्ला दिला. शिवाजी महाराजांच्या सैन्यात सुरुवातीपासून मुस्लिम समाजातील लोकांचा समावेश होता. 1656 मध्ये पठाणांची पहिली तुकडी बनवण्यात आली. दर्या सारंग, शिवरायांच्या नौदलाचा प्रमुख एक मुस्लिम होता.
जय शिवराय...
3. शिवरायांची राजमुद्रा
प्रिय विद्यार्थी मित्रहो..
आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा आणि त्याचा अर्थ जाणून घेणार आहोत. छत्रपती शिवाजीराजे जेव्हा पुण्याचा कारभार पाहू लागले, तेव्हा त्यांनी स्वतःची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली. शहाजीराजे व जिजाबाई यांची मुद्रा पारशी भाषेत होती, पण शिवाजी महाराजांनी राजमुद्रेसाठी संस्कृत भाषेचा वापर केला. आता तुम्ही म्हणाल की, राजमुद्रेवर काय मजकूर होता तर मी सांगतो,
"प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते". हा मजकूर होता. ज्याप्रमाणे प्रतिपदेचा चंद्र वाढत जातो आणि साऱ्या विश्वात वंदनीय होतो, तशीच शहाजींचा पुत्र शिवाजींची ही मुद्रा व तिचा लौकिक वाढत जाईल असा याचा अर्थ होतो, असा हा राजांच्या विचारांचा चंद्रोदय माझ्या आणि इतरांच्या जीवनात नेहमीच राहील.
जय शिवराय...
4. शिवाजी महाराजांचे युद्धतंत्र
प्रिय विद्यार्थी मित्रहो..
आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिवाजी महाराजांचे युद्धतंत्र समजून घेणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांकडे इतर साम्राज्यांच्या तुलनेत छोटी पण सुसज्ज आणि शिस्तबद्ध अशी फौज होती. या फौजेमध्ये असंख्य मावळे होते.शिवाजी महाराज यांना माहित होते की, मुघलांच्या प्रचंड मोठ्या आणि दारुगोळा व तोफखान्यांनी सज्ज असलेल्या फौजेला पारंपारिक युद्धपद्धतीने हरवणे कठीण होते. त्यामुळे महाराजांनी आपली स्वतःची अशी युद्धनीती विकसित केली. ती युद्धनीती म्हणजे ' गनिमी कावा' म्हणून ओळखले जाते आजूबाजूच्या भौगोलिक प्रदेशाचे आणि येथील दऱ्याखोऱ्यांचे सखोल ज्ञान, वेगवान फौज आणि शत्रूला अनपेक्षित हल्ले अशा पद्धतींचा वापर शिवरायांनी केला. ही युद्धनीती अतिशय यशस्वी ठरली. मुघलांच्या मोठमोठ्या फौजा शिवरायांच्या छोटेखानी फौजांसमोर निष्प्रभ ठरल्या, असा हा राजा शूर पराक्रमी होता, त्यांचे कार्य नेहमी आपल्याला प्रेरणा देत राहील.
जय शिवराय...












Click it and Unblock the Notifications