महाराष्ट्रात त्यांचा पराभव झाला तर.. दिल्लीतील NDA सरकार कोसळू शकते!' या' बड्या नेत्याचं भाष्य
Sanjay Raut's Big Statement on NDA Government : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून महाविकास आघाडी की, महायुती कोण जिंकणार हाच प्रश्न ज्याच्या त्याच्या मनात आहे. याचीच चर्चाही आहे पण खरंच कोण जिंकणार हे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे. पण महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता आल्यास दिल्लीतील सरकार कोसळू शकते असा खळबळजनक अंदाज आणि भाकित शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.
संजय राऊत यांनी रोखठोक या सामनामधील सदरात त्यांनी हे भाष्य केले आहे. या सदरातून त्यांनी अमित शहांसह महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे.

संजय राऊत यांनी रोखठोक या आपल्या साप्ताहिक लेखात काही शक्यता वर्तवल्या आहेत. महाराष्ट्राच्या निवडणुकीत आजचे चित्र काय दिसत आहे? यासंदर्भात त्यांनी आपली मतं व्यक्त करत पुढचे काही अंदाज बांधले आहेत.
निवडणुकीत भ्रष्ट्राचाराचा पैसा...
भ्रष्ट्राचारातून मिळवलेला पैसा निवडणुकीत ओतला जाईल असे संजय राऊत यांना वाटत असून यासंदर्भात त्यांनी भितीही व्यक्त केली आहे. तर सध्या महाराष्ट्रात जे सुरु आहे त्यामुळे राजकारणी आपली विश्वासार्हता गमावत आहेत हे महत्वाचे भाष्यही त्यांनी केले आहे.
महाराष्ट्राची निवडणूक कुणाच्या हातात गेली?
महाराष्ट्रातील निवडणुकीच्या सुत्रांसंदर्भात संजय राऊत यांनी आपल्या लेखात नमूद केले आहे. गुजरातच्या हाती महाराष्ट्राच्या निवडणुकीची सूत्रे गेली आहेत, असे कधीच घडले नव्हते असेही राऊतांचे म्हणणे आहे तसेच याचमुळे महाराष्ट्राची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, पण याबाबत फारसा संताप दिसत नाही हेही निरिक्षण संजय राऊत यांनी नोंदवले आहे.
बहिणींची मतं कुणाला?- राऊतांचे भाष्य
संजय राऊत यांनी लाडकी बहिण योजनेवर भाष्य केले आहे. यात त्यांनी महायुतीतील प्रमुख नेत्यांत 'लाडकी बहीण' योजनेचे श्रेय लाटण्याची धडपड सुरू असल्याचा आरोप आपल्या लेखात केला आहे. दीड हजार रुपये महिना या भावात बहिणींची मते मिळतील हा भ्रम तुटेल. लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ कोण?
याची लोक चर्चा करत असल्याचेही ते म्हणाले.
दिल्लीतील कुबड्यांचे सरकार कोसळू शकते- राऊत
महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा विशेष लक्ष घालतील असं म्हणत संजय राऊत यांनी एक खळबळजनक भाष्य केले आहे, त्यात त्यांनी महाराष्ट्रात पराभव झाला तर दिल्लीतील कुबडय़ांचे सरकार कोसळू शकते अशी शक्यता वर्तवली आहे. हरयाणाप्रमाणे महाराष्ट्रातही अपक्ष व लहान पक्षांच्या उमेदवारांना भाजपकडून रसद पुरवली जाईल आणि प्रचारात प्रचारात लोकांचे खरे प्रश्न लांब राहतील असेही त्यांचे म्हणणे आहे.
..तर निवडणुका शहांच्या हातचा खेळ- राऊतांचे टीकास्त्र
"मतदार याद्या शुद्ध करण्याची चळवळ स्वयंसेवी संस्थांनी हाती घ्यावी. सिव्हिल सोसायटीने हे काम हाती घेतले पाहिजे. नाहीतर निवडणुका हा एक अमित शहांच्या हातचा खेळ बनेल. योगी हे लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात जेथे गेले त्या सर्व ठिकाणी भाजपचा पराभव झाला. विधानसभा निवडणुकीत उत्तरेच्या फौजा मुंबईत येतील. महाराष्ट्र त्यांना काबीज करायचा आहे असेही राऊत यांनी म्हटले आहे.












Click it and Unblock the Notifications