उद्धव ठाकरेंवर बेछूट आरोप लावणारे नारायण राणे यांची प्रकृती ठीक आहे का?- संजय राऊतांचा पलटवार
Sanjay Raut on Narayan Rane : दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंचे नाव घेऊ नका, अशी विनंती करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मला दोन वेळा फोन केल्याचा दावा भाजपचे माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काल माध्यमांशी बोलताना केला होता. त्यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार पलटवार केला, तर राणे कुटुंबियांच ठाकरेंच्या कसे पायाशी आले होते, यावरही त्यांनी भाष्य केले.
काय म्हणाले संजय राऊत?
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी नारायण राणे यांना असा कोणताही फोन केला नाही. त्याउलट नारायण राणे यांना अटक केल्यानंतर त्यांच्या कुटुंबाकडून उद्धव ठाकरेंना फोन आल्याचा दावा त्यांनी केला. माझी या विषयावर उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली, असे काही घडले नाही, असे त्यांनी स्पष्ट सांगितले. कोणताही फोन यासंदर्भात नारायण राणे यांना झाला नाही आणि हे संभाषण झाले नाही, असे त्यांनी म्हटले.
मिलिंद नार्वेकर यांच्याशी देखील माझे बोलणं झालं. अशा प्रकारचे कोणतेही संभाषण झालेले नाही. नारायण राणे कशाच्या आधारावर असे प्रकारचे वक्तव्य करत आहेत हे समजून घेणे गरजेचे आहे. त्यांची प्रकृती बरी नाही का? त्यांनी सत्तरी पार केली आहे आणि आम्हाला त्यांच्या प्रकृतीची चिंता वाटू लागली आहे.

तेव्हा तर राणे कुटुंबियांचा फोन आला होता
उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे की, अशा प्रकारची कोणतेही संभाषण फोनवर झालेले नाही. नारायण राणे यांना जेव्हा अटक केली, मुख्यमंत्र्यांवर भाष्य केले होते तेव्हा त्यांच्या कुटुंबातून उद्धव साहेबांना फोन आले होते.
सांभाळून घ्या, त्यांची प्रकृती बरी नाही, त्यांना काही विकार आणि त्रास आहेत. त्यानंतर संध्याकाळी उद्धव साहेबांनी पोलिसांना सूचना देऊन त्यांची सुटका करायला लावली होती, असे संजय राऊत यांनी राणे कुटुंबांना सुनावले.
मोदी, शहांचे दळभद्री राजकारण
संजय राऊत पुढे म्हणाले की, केंद्रातून देखील फोन आले. अमित शाह यांचा उद्धव ठाकरे यांना फोन आला होता. ते आमचे केंद्रीय मंत्री आहेत. त्यांच्या कुटुंबीयांचे फोन होते. आता या गोष्टी काढायच्या असतात का? आता तुम्ही काढले त्यामुळे आम्हाला सांगावं लागलं. हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.
दहा वर्षांमध्ये सुडाचे राजकारणात वाढ झाली
संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, वैयक्तिक चर्चा अशाप्रकारे खोटा मुलामा लावून 5-10 वर्षांनी बाहेर काढल्या जात आहेत. असे काढायचे असेल तर प्रत्येकाचे काहीतरी असते. महाराष्ट्रात असे वातावरण कधी नव्हते. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात संवाद कायम होता. कोणतीही कारवाई कुटुंबापर्यंत जात नव्हती. कुटुंबाची बदनामी होत नव्हती. दुर्दैवाने गेल्या 10 वर्षात नरेंद्र मोदी, अमित शाह यांचे राज्य आल्यापासून असे दळभद्री राजकारण सुरु झाल्याचा हल्लाबोल देखील त्यांनी यावेळी केला.
तैमुर नावाचं उल्लेख करत मोदींवर निशाणा
औरंगजेबाची कबर ही राज्यातील राजकारणाच्या केंद्रस्थानी आली. त्यानंतर नागपूरमधील हिंसाचार उफाळला. विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात आरोप-प्रत्यारोप झाले. या सर्व घडामोडींचा समाचार खासदार संजय राऊत यांनी सामानाच्या रोखठोकमधून घेतला आहे. याबाबत संजय राऊत यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी तैमुर नावाचा उल्लेख करत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधलाय.
या देशामध्ये सगळ्यात जास्त हिंसाचार, हत्या, मंदिरं पाडली तो तैमुर. त्याच्या नावाने एक फिल्म स्टार आपल्या मुलाचं नाव ठेवतो आणि पंतप्रधान त्या तैमुरचं कौतुक करतात. तैमूर कहा है? असं विचारतात. जेव्हा हे सैफ अली खान आणि त्यांची बायको करीना पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटायला गेले होते. तेव्हा पंतप्रधानांना चिंता वाढली. तैमुरला का नाही आणले? तैमुरला मी उचलून घेतले असते, त्याची पप्पी घेतली असती, तैमूर तुम्हाला चालतो, हे हिंदुत्ववादी आहेत. हिंदुत्ववाद्यांना तैमूर चालतो नाही का, असा निशाणा साधत राऊतांनी मोदींवर हल्लाबोल चढवला.












Click it and Unblock the Notifications