मोठी बातमी ! संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांचा पराभव; कोण आहेत अमोल खताळ?
Maharashtra Assembly Election Result 2024- अमोल खताळ हेच माझ्यासाठी सुजय विखे आहेत. त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी आपली आहे, असे प्रतिपादन करुन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी संगमनेरची विधानसभा निवडणुकीत रंगत आणली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात आत्तापर्यंत तगडी फाईट देणारा नेता मिळत नव्हता. मात्र आता शिंदे गटाने अमोल खताळ यांना तिकीट दिले आणि अमोल खताळ जायंट किलर ठरले आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या अमोल खताळ यांनी बाळासाहेब थोरातांचा पराभव केला आहे.

सामान्य कार्यकर्ता हीच खताळांची ओळख
सामाजिक प्रश्नांसाठी प्रशासनालाही अंगावर घेणारा नेता ही खताळांची ओळख आहे. शिंदे गटाने तिकीट देण्यापूर्वी अमोल खताळ हे भाजपचे मतदारसंघ प्रमुख होते. गेली चार दशकांपासून संगमनेर हा थोरातांचा बालेकिल्ला समजला जात आहे. मात्र गेल्या चार-पाच वर्षांपासून येथे भाजपने व अमोल खताळ यांनी सामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आजवर संगमनेरमध्ये मातब्बर उमेदवार नसल्याने थोरातांची निवडणूक ही एकतर्फी होत होती, मात्र आता अमोल खताळांमुळे थोरातांना ही निवडणूक जड जाण्याची शक्यताही व्यक्त केली जात होती.
थोरातांविषयीची नाराजी केली कॅच
विद्यमान आ. बाळासाहेब थोरात हे अनेक वर्षे महसूल मंत्री होते. मात्र संगमनेर तालुक्यातील जिरायती पट्टयातील युवकांसाठी औद्योगिक वसाहत त्यांनी तयार केली नाही, असा आरोप आता खताळ यांच्याकडून केला गेला. संगमनेरमधील युवकांच्या रोजगारासाठी औद्यागीक वसाहत निर्माण करण्याचे आश्वासन खताळ भाषणातून देत होते. त्यामुळे तालुक्यातील मोठा तरुण वर्ग त्यांच्याकडे आकर्षित झाल्याचे दिसले. दुसरीकडे जमीन खरेदी- विक्री करणाऱ्या एजंटाचा सुळसुळाट, बोगस खरेदी प्रकरणे, कऱ्हे आणि चिकणी गावातील वनजमीनी हडप केल्याचा आरोप, हे मुद्देही थोरातांच्याविरोधात प्रचारात दिसत होते. या सगळ्यांचा फायदा अमोल खताळ यांना मिळाला आहे.
दोन वर्षांत 600 कोटींचा निधी
संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात आमदार असतानाही महायुतीने येथे दोन वर्षांत ६०० कोटींचा निधी दिला आहे. वेगवेगळ्या योजनांमधून पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहे. शिवाय लाडकी बहिण योजनेलाही तालुक्यात प्रचंड प्रतिसाद मिळाला असून लाखाच्या आसपास लाभार्थी आहेत. थोरातांनी तालुक्यात फक्त गौणखनिज माफिया तयार केल्याचा आरोपही सध्या चांगलाच चर्चेत होते. हे सगळे मुद्दे खताळ यांच्या प्रचारात सकारात्मक वातावरण तयार करत असल्याचेही दिसून आले
सुजय विखेंनी तयार केले होते वातावरण
यापूर्वी या मतदारसंघात सुजय विखे हेच थोरातांविरोधात लढणार असे वातावरण तयार झाले होते. सुजय विखे यांनी या तालुक्यात जवळपास पाच-सहा जंगी सभा घेत वातावरण निर्मातीही केली होती. मात्र शेवटच्या क्षणी भाजपऐवजी शिंदे गटाला हा मतदारसंघ गेल्याने अमोल खताळ यांच्या पारड्यात उमेदवारी पडली. वास्तविक सुजय विखेंनी या तालुक्यातील युवकांना सोबत घेत तयार केलेले वातावरण अमोल खताळ यांच्यासाठी पोषक ठरले.
विखेंची यंत्रणा आली कामी
अमोल खताळ हे पूर्वाश्रमीचे भाजपचेच कार्यकर्ते. शिवाय विखेंसोबत त्यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे यावेळी थोरातांविरोधात विखेंची प्रवरा यंत्रणा अमोल खताळांसाठी काम करत होती. शिवाय या तालुक्यात महायुतीचे कार्यकर्तेही एकसंघ होते. अजित पवार गट, शिंदे गट आणि भाजपने प्रत्यक्ष मैदानात उतरुन नियोयनबद्ध प्रचार सुरु केला. एकंदरित बाळासाहेब थोरातांसारख्या दिग्गजाचा पराभव करत अमोल खताळ हे जायंट किलर ठरले आहेत.












Click it and Unblock the Notifications