हा घातपात की अपघात?, अजित पवारांच्या निधनावर रोहित पवारांचे पुरावे; पायलटची मुद्दाम 'हिरोगिरी' का?
Rohit Pawar on Ajit Pawar Death Mystery : राज्याचे दिग्गज नेते दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्र अजूनही धक्क्यात असताना, आता या प्रकरणाला एक गंभीर वळण मिळाले आहे. आमदार रोहित पवार यांनी या अपघाताबाबत खळबळजनक संशय व्यक्त केला असून, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे अनेक अनुत्तरित प्रश्न उपस्थित केले आहेत. "पायलटला ही घटना घडवायचीच होती का?" असा थेट सवाल करत त्यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे.

सीसीटीव्ही फुटेजमधून मांडली शंका
रोहित पवार यांनी एका विशेष सादरीकरणाद्वारे अपघाताच्या वेळचे सीसीटीव्ही फुटेज प्रसारमाध्यमांसमोर आणले. हे फुटेज दाखवताना त्यांनी एका विशिष्ट रेषेकडे लक्ष वेधले.
ब्लास्ट आणि आग : "रनवेजवळ एक रेषा दिसत आहे आणि त्यानंतर लगेच मोठा स्फोट होतो. ती रेषा म्हणजे आग होती का?" असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
दृश्यमानतेचे उल्लंघन : ५ किमी पेक्षा कमी दृश्यमानता (Visibility) असतानाही विमान लँड करण्याचा प्रयत्न का झाला, यावर त्यांनी बोट ठेवले.
डीजीसीएच्या नियमांची पायमल्ली?
रोहित पवार यांनी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (DGCA) नियमांचा हवाला देत विमानाचे उड्डाणच बेकायदेशीर असल्याचा दावा केला.
व्हिज्युअल फ्लाईट रूल्स (VFR): नियमांनुसार, जोपर्यंत ५ हजार मीटरपर्यंत दृश्यमानता येत नाही, तोपर्यंत विमान उडवण्यास किंवा टेकऑफ करण्यास सक्त मनाई आहे.
चुकीची माहिती : बारामती एटीसीच्या (ATC) माहितीनुसार, सकाळी ८:३० वाजेपर्यंत दृश्यमानता केवळ ३ किमी होती. मग सकाळी ७ वाजता दृश्यमानता 'ऑल ओके' असल्याचा अहवाल कोणी आणि का दिला? असा सवाल रोहित पवारांनी केला.
'Arrow' कंपनी आणि पायलटवर गंभीर आरोप
रोहित पवारांनी या संपूर्ण प्रकरणात Arrow कंपनी आणि वैमानिकाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे.
"पायलटला ठाऊक होतं की दृश्यमानता नाही, मग तो 'हिरोगिरी' करायला का गेला? त्याच्यावर कोणाचे प्रेशर होते की त्याने हे मुद्दाम केले? त्याच्या मनात ही घटना घडवायचीच होती का?", असा सवाल आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला.
कंपनीची जबाबदारी: सकाळी ७ वाजता धुकं जास्त असतानाही 'Ok to take off' असे सांगून अजित पवारांना विमानात बसवण्यात आले. नियमांचे पालन न केल्याबद्दल Arrow कंपनीला या दुर्घटनेसाठी थेट जबाबदार धरले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
बाहेरील एजन्सीमार्फत तपासाची मागणी
हा केवळ तांत्रिक बिघाड किंवा नैसर्गिक अपघात नसून त्यामागे काही मोठे षड्यंत्र असण्याची शक्यता रोहित पवारांनी वर्तवली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, केंद्र सरकारच्या किंवा एखाद्या निष्पक्ष बाहेरील एजन्सीमार्फत या प्रकरणाचा सखोल तपास व्हावा, जेणेकरून सत्य समोर येईल, असे त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.












Click it and Unblock the Notifications