'नाईलाजाने मला सत्य...' रोहित पवारांकडून नवा व्हिडिओ पोस्ट, कोकाटेंवर गंभीर आरोप
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर विधानसभेत ऑनलाईन रमी खेळल्याचा आरोप झाल्यानंतर राज्यात मोठा राजकीय गदारोळ सुरू आहे. या प्रकरणी आमदार रोहित पवार यांनी व्हिडिओ ट्वीट करून आरोप केला होता. आज (२२ जुलै) नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेऊन कोकाटेंनी हे आरोप फेटाळले.

"ऑनलाईन रमी खेळताना मोबाईल नंबर आणि बँक खाते जोडलेले असावे लागते. माझे कोणतेही मोबाईल नंबर किंवा बँक खाते रमी अॅपला जोडलेले नाही. तुम्ही कुठेही चौकशी करा. ऑनलाईन रमी सुरू झाल्यापासून आजपर्यंत मी एक रुपयाचीही रमी खेळलो नाही. मला रमी खेळताही येत नाही. हा आरोप चुकीचा आणि बिनबुडाचा आहे. ज्या राजकीय नेत्यांनी आरोप करून माझी बदनामी केली, त्यांना मी कोर्टात खेचणार आहे," असा इशारा कोकाटेंनी दिला.
रोहित पवारांचा कोकाटेंवर प्रतिहल्ला
यावर आता रोहित पवार यांनी पुन्हा एकदा कोकाटेंना प्रत्युत्तर दिले आहे. "सभागृहाचं कामकाज संपलं होतं, हे कृषिमंत्री महोदयांचं विधान धडधडीत खोटं आहे. उलट विकासाच्या मूळ प्रवाहापासून दूर असलेल्या आदिवासी बांधवांना दुधाळ जनावरे देण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सभागृहात चर्चा सुरू होती, पण 'ओसाड गावच्या पाटलांना' या चर्चेत रस नसावा," असा टोला रोहित पवारांनी लगावला. तसेच, "मला सांगा, पत्त्याची कोणती जाहिरात स्किप करण्यासाठी ४२ सेकंद लागतात हो?" असा सवालही त्यांनी विचारला.
"राजीनामा दिला असता तर ही वेळ आली नसती"
"विझताना दिव्याची ज्योत मोठी होते, तसेच काहीसे कोकाटे साहेबांचे झाले आहे. आज राजीनामा देऊन शेतकऱ्यांवर ते उपकार करतील असे वाटत होते, पण 'गिरे तो भी टांग उपर' अशी भूमिका घेत त्यांनी कोर्टात जाण्याची भाषा केली, हे दुर्दैव आहे. मंत्री महोदय स्वतःला वाचवण्यासाठी आज जेवढा खटाटोप करत आहेत, त्यापेक्षा दिलेल्या पदाला न्याय देण्यासाठी केला असता, तर ही वेळ आली नसती," असे परखड मत रोहित पवारांनी व्यक्त केले.
"नाईलाजाने मला सत्य जनतेच्या कोर्टात आणावं लागतंय"
रोहित पवारांनी पुढे म्हटले की, "विधिमंडळाची अप्रतिष्ठा होऊ नये म्हणून आवाज असलेले हे व्हिडिओ शेअर करणे मी टाळत होतो, पण मंत्री महोदयांनी कोर्टात जाण्याची भाषा केल्याने नाईलाजाने मला सत्य जनतेच्या कोर्टात आणावे लागत आहे."
"आता चौकशी करायचीच असेल, तर कृषीमंत्री पत्ते खेळत होते की नाही, याचीही चौकशी करावी आणि ही चौकशी निष्पक्ष पद्धतीने होण्यासाठी नैतिकता दाखवून कोकाटे साहेबांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा," अशी मागणी रोहित पवारांनी केली. "महत्वाचे म्हणजे सत्य हे झाकणार नसल्याने राजीनामा देण्यासाठी पुढील अधिवेशनाची कशाला वाट पाहता आणि शेतकऱ्यांना सहन करायला लावता?" अशी खोचक टीकाही त्यांनी केली.












Click it and Unblock the Notifications