राज्याच्या राजकारणात ऐतिहासिक पर्व! राज-उद्धव ठाकरेंची युती, संजय राऊत काय म्हणाले? वाचा
Raj uddhav thackeray brothers alliance: गेल्या अनेक वर्षांपासून ज्याची प्रतीक्षा संपूर्ण महाराष्ट्र करत होता, ती ऐतिहासिक घटना अखेर घडली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांची अधिकृत युती झाली असून जागावाटपाचा फॉर्म्युलाही निश्चित झाला आहे, अशी खळबळजनक माहिती खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

'जागावाटप संपलं, आता फक्त घोषणेची प्रतीक्षा'
संजय राऊत यांनी स्पष्ट केले की, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात सविस्तर चर्चा झाली असून युतीवर शिक्कामोर्तब झाले आहे. "कार्यकर्त्यांनी ही युती आधीच स्वीकारली असून मुंबई, नाशिक, पुणे आणि ठाण्यामध्ये दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकत्र कामाला लागले आहेत. जागावाटपावर काल रात्री शेवटचा हात फिरवण्यात आला असून आता फक्त दोन्ही नेत्यांनी एकत्र येऊन अधिकृत घोषणा करणे बाकी आहे," असे राऊत म्हणाले.
मुंबई महापालिकेवर लक्ष
मुंबईतील काही जागांवर अदलाबदल आणि विद्यमान नगरसेवकांच्या जागांबाबत चर्चा पूर्ण झाली आहे. कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेऊन मार्ग काढण्यात आला आहे.
नाशिक, पुणे, ठाण्यात चित्र स्पष्ट
नाशिक आणि पुण्यातील युतीचा विषय मार्गी लागला आहे. कल्याण-डोंबिवली, ठाणे आणि मीरा-भाईंदरमधील जागावाटपाचा तिढा सुटला आहे.
एबी फॉर्म वाटप सुरू
आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून दोन्ही पक्षांकडून एबी फॉर्म वाटपाची प्रक्रियाही वेगाने सुरू करण्यात आली आहे.
संजय राऊत यांची भाजपवर सडकून टीका
"संविधानिक संस्था भाजपच्या पायाखाली चिरडल्या जात आहेत. महाराष्ट्र हे जिवंत माणसांचे राज्य आहे, आम्ही मोठे नाही पण जिवंतपणे लढणारे आहोत," अशा शब्दांत राऊतांनी केंद्र सरकार आणि भाजपवर निशाणा साधला.
अजित पवार-भाजप युतीवर टोला
"आमच्यामध्ये सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत, पण अजित पवार आणि भाजपमध्ये अद्याप युती जाहीर का झाली नाही?" असा सवाल करत राऊतांनी महायुतीमधील गोंधळावर बोट ठेवले.
राज-उद्धव ठाकरे बंधू एकत्र आल्याने काय होईल?
१. मराठी मतांचे एकत्रीकरण
गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना आणि मनसेमध्ये विभागली जाणारी हक्काची 'मराठी मते' आता एकाच पारड्यात पडतील. यामुळे भाजप आणि शिंदे गटासमोर मोठे आव्हान उभे राहील.
२. 'मुंबई' मराठी अस्मितेचा मुद्दा पेटेल
ही युती 'मराठी अस्मिता' आणि 'स्थानिक विरुद्ध उपरे' या मुद्द्याला पुन्हा एकदा धार देईल, ज्याचा थेट फटका उत्तर भारतीय मतांवर अवलंबून असलेल्या भाजपला बसू शकतो.
३. महाविकास आघाडीचे भवितव्य
काँग्रेसने या युतीपासून दूर राहून 'एकला चलो रे'ची भूमिका घेतल्याने, मविआमध्ये उभी फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे तिरंगी किंवा चौरंगी लढती होऊन मतांचे मोठ्या प्रमाणावर विभाजन होईल.
४. अस्तित्वाची लढाई
शिंदे गट आणि अजित पवार गटासाठी ही निवडणूक स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्याची संधी आहे. ठाकरे बंधूंच्या युतीमुळे शिवसैनिकांमधील संभ्रम कमी होऊन मूळ कॅडर पुन्हा सक्रिय होईल.
५. मुंबई महापालिकेवर वर्चस्व
बीएमसीची सत्ता काबीज करण्यासाठी ही युती 'गेमचेंजर' ठरू शकते. दादर, माहिम, परळ यांसारख्या कोअर मराठी पट्ट्यात ठाकरे बंधूंचे पूर्ण वर्चस्व निर्माण होईल.












Click it and Unblock the Notifications