सरकारचे धोरणच मान्य नाही! हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा एल्गार; 'या' दिवशी करणार मुंबई शहर जाम!
Raj Thackeray, March in Mumbai on July 6 for Marathi language : महाराष्ट्रात इयत्ता पहिलीपासून तिसरी भाषा म्हणत अप्रत्यक्षपणे हिंदी भाषेची सक्ती केली जात आहे, असा आरोप करत सरकारच्या शिक्षण धोरणाला मनसेकडून विरोध केला जात आहे. दरम्यान, राज ठाकरे यांनी आज सरकारच्या विरोधात एल्गार उगारणार असल्याचे स्पष्ट केले. तर आगामी काळात सरकारला देखील मराठी माणसाची ताकद दिसेल, असेही ते म्हणाले.
सरकारला दिला इशारा!
सरकारने आम्हाला पटवून देण्याचा विषयच नाही, आम्हाला त्यांचे धोरण मान्य नाही, त्यामुळे राज्यभरातील सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र यावे, अशी साद देखील राज ठाकरे यांनी घातली. दुसरी बाब म्हणजे येत्या 6 जुलै रोजी मराठी माणसांचा मोर्चा गिरगाव मधून निघणार असून तो सरकारला अल्टिमेटम असेल असेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.

काय म्हणाले राज ठाकरे?
पहिलीपासून हिंदी विषय सक्तीचा करण्यावरुन मनसेने विरोध केला. त्यानंतर आज सकाळीच शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री आता येऊन गेले त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. मी पूर्णपणे भूमिका फेटाळून लावली असून आम्हाला हे मान्य नसल्याचे सांगितले.
खरतर 5 वी नंतरच पर्यायी भाषेचा मुद्दा आहे, त्यांना हेही सांगितले की, NEP मध्ये असे काही नाही हे राज्यांवर टाकले आहे, मग ते का करत नाहीत, असा सवाल राज यांनी उपस्थित केला.
तर, सीबीएसई या शाळा आल्या त्या आयएएस अधिकाऱ्यांसाठी काढण्यात आल्या आहेत. त्या शाळेच वर्चस्व करण्याचे सुरू आहे आणि महाराष्ट्र हे का करत आहे? बाकी राज्य काही अशी भूमिका घेत नाही. आमचा या संपूर्ण प्रकरणाला विरोध आहे, असेल आणि कायम राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुंबईत 6 जुलैला मराठी माणसांचा मोर्चा!
राज ठाकरे म्हणाले की, हिंदी असो किंवा इतर कोणत्याही भाषेची सक्ती राहणार नाही. मी सर्व पक्षांना आवाहन करत आहे की, येत्या 6 जुलैला आम्ही गिरगाव चौपाटीवरुन मोर्चा काढायचे ठरवलं आहे. या मोर्चात कोणताही झेंडा नसेल, हा मराठी माणसाचा मोर्चा असेल, आम्ही सर्वांना या मोर्चाचे आमंत्रण देत आहोत. त्यामुळे, 6 जुलै रोजी सकाळी 10 वाजता हा मोर्चा असणार आहे.
रविवारचा दिवस निवडला, कुठून कसा जाणार मोर्चा?
राज ठाकरे म्हणाले की, या मोर्चासाठी खास करून रविवार निवडला आहे, कारण सर्व येऊ शकतील, हा मोर्चा गिरगाव ते आझाद मैदान असा असेल. मी बाकीच्या पक्षासोबत बोलणार आहे, असेही राज ठाकरे यांनी सांगितले.
मोर्चात झेंडा नसेल, मराठीचा अजेंडा असणार!
राज ठाकरे म्हणाले की, येत्या 6 जुलैला गिरगांव चौपाटीवरुन आम्ही मोर्चा काढायचा ठरवला आहे, या मोर्चात कुठलाही झेंडा नसेल. सर्व साहित्यिक, मराठी प्रेमी, सर्वपक्षीयांनी या मोर्चात सहभागी व्हावे.
कारण, 6 जूलैच्या मोर्चात कोणताही झेंडा नसेल तर मराठीचा अजेंडा असेल. या मोर्चात कोण येतंय हे मला बघायचंय, तसेच कोण नाही येत तेही बघायचंय, असा इशाराच राज यांनी दिला.
कोणत्याही वादाशिवाय महाराष्ट्रहितासाठी एकत्र आलं पाहिजे या वाक्याचा अर्थ तुम्हाला मोर्चात कळेल. मोर्चात कोणते कलाकार येतायेत ते बघायचंय. मी बोलल्यानंतर ते येतील, माझे त्यांच्याशी बोलणे सुरू आहे. आपण विठ्ठल ला साकडे घालू, भाषा सोडून इतर कोणतीही एक्टिविटी करा, स्विमिंग शिकवा अशी सूचना देखील राज यांनी केली आहे.
दादा भुसे मराठी शिकूनच मोठे झालेत ना?
राज ठाकरे म्हणाले की, हिंदी भाषेसाठी शिक्षकांचा तुटवडा आहे, मी तेही म्हंटले की शिक्षक नाहीत. तर 10 हजार शिक्षकांची भरती करणार असल्याचे सरकार सांगत आहे. 90 हजाराचे कंत्राट देऊन बसला आहात.
जेएनपीटीला रिक्त पद आहेत आणि मुलाखती अदानी पोर्टवर, असा टोलाही राज यांनी लगावला. 10 हजार शिक्षक भरती करणार म्हणून सांगितलं, पण पगार द्यायला पैसे आहेत का? अनेक मोठे प्रश्न आहेत मग भाषेवर का येत आहे. काही मोठे लपवण्याचा प्रयत्न आहे का?.
JNPT भरती आहे पण इंटरव्ह्यू अदानी पोर्ट मध्ये का चालू आहे?
हिंदीमध्ये असे काय आहे, असा सवाल राज यांनी उपस्थित केला. तसेच, हिंदी शिकून चित्रपटात काम मिळणार आहे का, महाराष्ट्र शिक्षण पद्धतीमुळे मोठा आहे. मग असा काय साक्षात्कार आहे की हिंदी मुळे होणार आहे, असा सवाल राज यांनी विचारला.
दादा भुसे पण मराठीतून शिक्षण घेऊन शिक्षणमंत्री झाले, का त्यांना स्विमिंग येत होतं म्हणून झाले. भाषा सोडून कला, क्रीडा याबाबत जर गुणवत्ता ठरवली जाणार असेल तर आमचा त्याला अजिबात विरोध राहणार नाही.












Click it and Unblock the Notifications