नंदूरबारमध्ये राहुल गांधींची खटाखट आश्वासने, म्हणाले महिलांना आता...
नंदुरबार : महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी गुरुवारी राहुल गांधी यांनी नंदुरबारमध्ये सभा घेतली. या सभेत मोदींवर प्रहार करताना त्यांनी अनेक घोषणाही केल्या. महायुतीच्या लाडकी बहिण योजनेवर महाविकास आघाडीकडून राहुल गांधी यांनी महालक्ष्मी योजनेचा पुनरुच्चार केला. या योजनेतून महिलांना आता तीन हजार रुपये महिना प्रत्येक महिन्यांच्या एक तारखेला देण्याचे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले. याशिवाय राज्यात बसचा प्रवास मोफत करण्याची घोषणाही त्यांनी केली.
राहुल गांधींनी दिले खटाखट आश्वासने
राहुल गांधी म्हणाले, महाविकास आघाडीच्या महालक्ष्मी योजनेतून महिलांना प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला खटाखट तीन हजार रुपये मिळणार आहे. तुम्ही सकाळी उठल्यावर तुमच्या खात्यात तीन हजार रुपये दिसतील. तुम्हाला बसमध्ये तिकीट मोफत असणार आहे. तुम्ही तिकीट न काढता राज्यभर फिरु शकणार आहात. महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर शेतकऱ्यांना तीन लाख कर्ज माफ होणार आहे.

आरक्षण 50 टक्केची मर्यादा रद्द करणार आहे. जातीय जनगणना करणार आहे, असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं. बेरोजगारांना चार हजार रुपये महिना, अडीच लाख तरुणांना सरकारी नोकरी, उपचारासाठी गरिबांना 25 लाखापर्यंत विमा सुरक्षा अशी अनेक आश्वासने राहुल गांधी यांनी नंदूरबारच्या सभेत दिली.
मोदी सरकारवर साधला निशाणा
भारत सरकार 10 अधिकारी चालवतात. परंतु त्यामध्ये केवळ एकच आदिवासी अधिकारी आहे. त्यालाही निर्णय घेण्याचा अधिकार नाही, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. भारत सरकार शंभर रुपये खर्च करत असेल, तर आदिवासी अधिकारी फक्त दहा पैसे खर्च करण्याचा निर्णय घेतात. आदिवासी देशात आठ टक्के आहे. परंतु त्यांची तेवढी भागेदारी नाही. माध्यमांमध्ये किंवा आदाणी, अंबानी यांच्या कंपनीत एकही आदीवासी अधिकारी मिळणार नाही. पण त्याच कंपनीतील मजूर मात्र आदिवासी आहेत. आदिवासींना सरकारमध्ये मोठ्या नोकऱ्या, सत्तेत वाटा देण्याचे काम आम्ही करु, असे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले.
मोदी-फडणवीसांवर हल्लाबोल
राहुल गांधी म्हणाले, नरेंद्र मोदीजी म्हणतात की हे संविधान पोकळ आहे. आयुष्यात संविधानच वाचलं नसल्याने त्यांना ते पोकळ वाटतं. हे संविधान रिकामं नसून, बुद्धाची, फुले, आंबेडकरांची विचारसरणी त्यात आहे. गांधींच्या विचाराचा, हा भारत आहे. हे संविधान म्हणजे भारताचे ज्ञान, भारताचा आत्मा आहे. ते रिकामं असल्याचा उल्लेख करून मोदीजी भारताचा अपमान करत आहात, अशा शब्दात राहुल गांधी यांनी पीएम मोदी यांच्यावर हल्ला चढवला. त्याबरोबर संविधानाच्या रंगावरुन फडणवीसांनी केलेल्या वक्तव्याचाही त्यांनी समाचार घेतला.












Click it and Unblock the Notifications