Rahul Gandhi राहुल गांधी हे 'मतचोरीचे बादशाह' 'या' नेत्याचा घणाघात, उदाहरणासह काँग्रेसला प्रत्युत्तर
Rahul Gandhi : काँग्रेसचे खसदार, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज हायड्रोजन बाॅम्ब फोडत महाराष्ट्रात भाजपने मतचोरी केल्याचा दावा केला आहे. यानंतर भाजप प्रचंड आक्रमक झाली असून 'उठसूठ मतचोरीचा डांगोरा पिटणारे राहुल गांधी हेच मतचोरीचे बादशाह आहेत,' असा भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आरोप केला आहे.
राहुल गांधी सध्या जे आरोप करत आहेत, याबद्दल त्यांनी देशाची माफी मागावी अशी मागणीही भाजपकडून करण्यात आली आहे.आज गुरुवारी मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत केशव उपाध्ये यांनी आपल्या शैलीत राहुल गांधीवर टीका केली.

पुराव्याविना आरोपांचा धंदा
उपाध्ये म्हणाले की, काँग्रेस पक्ष पत्रकार परिषदा घेऊन आणि व्हिडिओ सादरीकरण करून 'मतचोरी'चा खोटा मुद्दा उचलून धरतो, पण कोणताही पुरावा सादर करत नाही. हा निव्वळ एक 'धंदा' झाला आहे. मतमोजणी किंवा मतदारयादीबाबत काही आक्षेप असल्यास त्यांनी निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्र सादर करावे, असे आव्हान त्यांनी दिले. यासोबतच, त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधत, 'उबाठा' गट राहुल गांधींना याबद्दल प्रश्न विचारण्याचे धाडस दाखवेल का, असा सवाल केला.
कर्नाटक निकालाने काँग्रेसचा पर्दाफाश
उपाध्ये यांनी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निकालाचा दाखला देत काँग्रेसचा दुटप्पीपणा उघड केला. कर्नाटक उच्च न्यायालयाने काँग्रेस आमदाराची आमदारकी रद्द करून मतांची फेरमोजणी करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे काँग्रेसचे मतचोरीचे पितळ उघडे पडले असून, त्यांचे आरोप त्यांच्यावरच 'बूमरँग' झाल्याचे त्यांनी सांगितले.
काँग्रेसचा 'मतचोरी'चा पूर्वइतिहास
उपाध्ये यांनी काँग्रेसच्या 'मतचोरी'चा पूर्वइतिहास अनेक उदाहरणांसह दावा केला आहे. महाराष्ट्रात पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराड मतदारसंघात त्यांच्या नातेवाईकांच्या एकाच घरात अनेक नावे मतदार म्हणून नोंदवली गेली होती. 'हेच पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसच्या मतदारयादी निरिक्षणाचे प्रमुख आहेत,' हे हास्यास्पद असल्याचे उपाध्ये म्हणाले.
काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा आणि त्यांच्या पत्नीची वेगवेगळ्या मतदारसंघात प्रत्येकी दोन निवडणूक ओळखपत्रे आढळली होती. या आणि अशा अनेक उदाराणांमुळे काँग्रेसचा 'मतचोरी'चा पूर्वइतिहास असून, राहुल गांधी यांचा सध्याचा कांगावा पूर्णपणे खोटा असल्याची टीका त्यांनी केली.
राहुल गांधींकडे पुरावे नाहीत
उपाध्ये यांनी पुढे सांगितले की, राहुल गांधी यांना कायदेशीर लढाई लढायचीच नाही, कारण त्यासाठी लागणारे पुरावे त्यांच्याकडे नाहीत. त्यांना केवळ 'मतचोरी झाली' असा कांगावा करत देशभरात अराजक पसरवायचे आहे. 'राहुल यांच्या बिनबुडाच्या आरोपांची री ओढत नक्षलवाद्यांकडून ११ पानी पत्रक काढले जाते, यावरून काँग्रेसचा डाव किती घातक आहे, याची कल्पना येते,' असेही त्यांनी नमूद केले.












Click it and Unblock the Notifications