मी कोणत्याही ढेकणाला आव्हान देत नाही, उध्दव ठाकरेंची फडणवीसांवर जोरदार टीका
पुणे : आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे यांनी पक्षाच्या मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. आज पुण्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या पुण्यातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा संपन्न झाला. ठाकरे यांनी भाजपावर पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे .
"आता लढाई मैदानात आहे, दोन दिवसांपूर्वी मुंबईतल्या सभेत बोललो की, एक तर तू राहशील किंवा मी राहील. माझ्या पायाशी कलिंगड ठेवलेलं होतं. त्यामुळे काही जणांना वाटलं मी त्यांना आव्हान दिलं. मी कोणत्याही ढेकणाला आव्हान देत नाही. मी म्हणजे कोण आणि तू म्हणजे कोण? याची संकल्पना उद्धव ठाकरे यांनी सांगितली.

मी म्हणजे माझा संस्कारी महाराष्ट्र आणि तू म्हणजे महाराष्ट्रावर दरोडे टाकणाऱ्या दरोडेखोरांचा पक्ष. ढेकणाला कधी आव्हान दिलं जात नाही, ढेकणं चिरडायची असतात. कुणीतरी हे आव्हान स्वतःवर घेतलं. त्यानं सांगितलं माझ्या नादाला लागू नका. मी म्हणतो, तुझ्या नादाला लागण्याएवढ्या किंमतीचा तू नाहीच आहेस",अशी टीका उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, काही दिवसांपूर्वी पुण्यात भाजपाचा एक कार्यक्रम झाला. इतिहासात आपण डोकावलं, तर शाहिस्तेखान जरा तरी हुशार होता, असं म्हणावं लागेल. त्याचं बोटावर निभावलं. तीन बोटं कापली गेल्यानंतर पुन्हा महाराष्ट्रात नाही आला. त्यातनं काही शहाणपण यांनी घेतले असते तर परत महाराष्ट्रात आले नसते, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली.
"पण ते (अमित शाह) परत का आले? तर महाराष्ट्राच्या जनतेने दिलेल्या फटक्यांचे वळ कुणाकुणाच्या अंगावर उमटले. हे पाहण्यासाठी ते आले. अहमदशाह अब्दालीचा राजकीय वंशज हा पुण्यात आला होता. तो अहमद शाह होता आणि हे अमित शाह आहेत. अहमद शाहचा राजकीय वशंच इथे वळवळायला आला होता.
नवाज शरीफचा केक खाणाऱ्यांकडून आता आम्ही हिंदुत्व शिकायचं का? शिवसेनेने हिंदुत्व सोडल्याचे हे म्हणाले. आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही. शंकराचार्यांनी म्हटल्याप्रमाणे विश्वासघातकी लोक हिंदू असू शकत नाही. तुम्ही आमच्याशी विश्वासघात केला", असे जोरदार टीकास्र उद्धव ठाकरेंनी सोडलं.












Click it and Unblock the Notifications