विधानभवनात भरली क्रिकेटची शाळा त्या चार भारतीय खेळाडूंचा सत्कार, राजकीय नेत्यांची चौफेर फटकेबाजी
मुंबई -टी- ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेला नमवत जगज्जेदेतपद मिळवणाऱ्या भारतीय क्रिकेट संघातील विजयी खेळाडूंचे स्वागत करुन काल मुंबईत भव्यदिव्य रॅली निघाली. त्यानंतर आज विधानभवनात जंगी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी विश्वविजेत्या भारतीय संघात योगदान देणाऱ्या चार खेळाडूंचा सत्कार करीत राजकारण्यांनीही क्रिकेटवर भरभरुन बोलत चौफेर शाब्दीक फटकेबाजी केली.
विश्वविजेतेपदाला गवसणी घालणाऱ्या भारतीय संघात योगदान देणाऱ्या महाराष्ट्रातील चार खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यामध्ये मुख्यमंत्र्यांनी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, शिवम् दुबे, सूर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल यांचा सन्मान केला. तसेच संघव्यवस्थापक अरुण कानडे, पारस म्हांबरे यांचाही विधानभवनात करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, निलम गोऱ्हेंसह दोन्ही सभागृहाचे बहुतांश सदस्य यावेळी उपस्थित होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नाॅर्वेकर यांनी आपल्या भाषणात भारतीय खेळाडूंचे कौतूक केले. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, निलम गोऱ्हे यांनीही भाषणातून खेळाडूंचे कौतूक केले.
काय म्हणाला शिवम् दुबे?
मी महाराष्ट्रात राहतो याचा अभिमान आहे, हा दिवस माझ्या आयुष्यात येईल हे मला वाटले नव्हते, जय महाराष्ट्र.
तो झेल हातात बसला...- सुर्यकुमार यादव
महाराष्ट्राच्या वतीने माझे स्वागत झाले, त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. माझ्याकडे या स्वागतासाठी शब्द नाही. मॅचमध्ये तो कॅच हातात बसला. भारताला पुन्हा विश्वविजेता बनवण्याचे स्वप्न आहे असे सूर्यकुमार यादव म्हणाला.
सर्व खेळाडूमुळे विश्वविजेता बनलो- रोहीत शर्मा
11 वर्षानंतर आपण जगज्जेता बनलो. हे सर्व खेळाडूंमुळे शक्य झाले. सर्व खेळाडू उत्कृष्ट होते. विविध सामन्यात वेगवेगळ्या खेळाडूंनी वेगवेगळा खेळ केला त्यामुळे हे शक्य झाले.सूर्याने झेल हातात बसला असं म्हटलं त्यावर मी म्हणतो की, बरं झालं सूर्याच्या हातात बसला नाहीतर मी पुढे त्याला बसवला असता..असे वक्तव्य रोहित शर्माने करताच विधानभवनात एकच हशा पिकला.
चांगली बॅटींग म्हणजे जनतेची चांगली रेटींग
आम्हा राजकारण्यांचेही क्रिकेटसारखेच आहे, कोण कुणाला रनआऊट करेल हे सांगता येत नाही. त्यामुळे आम्हाला चांगली बॅटींग करावी लागते, त्यामुळेच आम्हाला चांगली रेटींगही मिळते. दोन वर्षांपूर्वी आमच्या पन्नास जणांनी काढलेली विकेट कुणीही विसरु शकणार नाही. अशा शब्दात यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फटकेबाजी केली.












Click it and Unblock the Notifications