मुंबईतून क्लीन-अप-मार्शल योजना का बंद होणार, मुंबई महापालिकेला का घ्यावा लागला हा निर्णय, जाणून घ्या
Mumbai Clean-Up Marshals discontinued : मुंबईतील क्लीन-अप मार्शलची योजना आता कायम स्वरुपी बंद करण्याचा निर्णय महापालिका प्रशाननाकडून घेण्यात आला आहे. महापालिका आयुक्त भूषण गगराणी याला दुजोरा दिला आहे. नेमकी ही सेवा का बंद करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला, त्यात काय अडचणी आल्या होत्या. याबाबत देखील माहिती समोर आली आहे.
कधीपासून बंद होणार ही योजना
मुंबईत येत्या 4 एप्रिलपासून क्लीन-अप मार्शल सेवा पूर्णपणे बंद होणार असल्याची माहिती आहे. मार्शलकडून नागरिकांना धमकावले जाते, हप्ते घेतले जातात, लाच घेतली जाते, अशा तक्रारी मोठ्या प्रमाणावर येऊ लागल्याने योजना गुंडाळण्याच्या निष्कर्षाप्रत प्रशासन आले आहे.

पालिकेच्या पाच रुग्णालयातून केली मार्शलची हकालपट्टी
नागरिकांसह पालिकेच्या अनेक विभाग अधिकाऱ्यांनीच मार्शलमुळे उपद्रव होत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. लाचखोरीच्या आरोपांमुळे काही दिवसांपूर्वीच पालिकेच्या पाच रुग्णालयांमधून मार्शलची हकालपट्टी करण्यात आली होती. रुग्णालयात नागरिक, रुग्णांच्या नातेवाईकांनी अस्वच्छता करू नये, यासाठी त्यांची नियुक्ती झाली होती. परंतु, तेथेही ते रुग्णांच्या नातेवाईकांकडून पैसे मागत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर आल्या होत्या.
मार्शल पुरविणाऱ्या संस्थांनी केली हेराफेरी
पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी मध्यंतरी या योजनेचा आढावा घेतला होता. मार्शल पुरवणाऱ्या काही संस्थांनी हेराफेरी केल्याचेही आढळून आले होते. निर्धारित संख्येपेक्षा कमी संख्येने मार्शल पुरवल्याची बाब उघड झाल्यानंतर काही संस्थांना सुमारे ६३ लाखांचा दंडही ठोठावला होता.
काय आहेत तक्रारी?
अस्वच्छता करणाऱ्यांकडून 200 ते 2000 रुपये आकारण्याचे अधिकार मार्शलना दिले होते. परंतु, काही मार्शल दंडाची रक्कम घेत, पावती देत नसत. काही मार्शल प्रकरण मिटवण्यासाठी लाच घेत. काही विनाकारण धमकावून लोकांकडून पैसे मागत. कागदाचा कपटा रस्त्यावर टाकला तर तो उचलून कचरा पेटीत टाकण्याची शिक्षा आहे. पण मार्शल तशी सवलत न देता पैसे मागत असत, अशा प्रकारे तक्रारींचं स्वरुप आहे.












Click it and Unblock the Notifications