वारकरी आणि कीर्तनकारांसाठी आनंदाची बातमी, मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय
पंढरपूरच्या विठुरायाची यात्रा व आषाढी एकादशी दोन दिवसांनी येऊ घातली असताना राज्यातील तमाम वारकऱ्यांसाठी शासनाने मोठी आनंदाची बातमी दिली आहे. महाराष्ट्र राज्यातील कीर्तनकार व वारकऱ्यांना सोयी सुविधा पुरवण्याकरिता"मुख्यमंत्री वारकरी महामंडळ" स्थापन करण्याचा मोठा निर्णय शासनाने घेतला आहे.
त्या संदर्भातील सामाजिक न्याय विभागाचा शासन निर्णय रविवारी प्रसिद्ध करण्यात आला आहे. या महामंडळाचे मुख्यालय ते पंढरपूर येथे असणार आहे.

राज्याला वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा लाभली आहे. महाराष्ट्रातील गावागावातून भाविक वारकरी दरवर्षी वारीला जातात वारीमध्ये प्रामुख्याने कामकरी, कष्टकरी, शेतकरी यांचा समावेश असतो. परंतू कालानुरूप दिंड्यांची संख्या वाढल्याने वारीच्या व्यवस्थापनाचे सूक्ष्म नियोजन महत्त्वाचे ठरले आहे.
याकरिता वारकरी महामंडळाची संकल्पना आली असून राज्य मंत्रिमंडळाच्या दिनांक 11 जुलै 2024 रोजी झालेला बैठकीत "मुख्यमंत्री वारकरी महामंडळ" स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शेकडो वर्षापासून पांडुरंगाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांची पायी दिंडीची माध्यमातून वारी करण्याची पवित्र परंपरा महाराष्ट्रात आहे. तीर्थक्षेत्रांचा विकास, कीर्तनकार, वारकऱ्यांना अन्न, सुरक्षा, वैद्यकीय मदत. विमाकवच, पायाभूत सुविधा इत्यादी सोयी-सुविधा पुरवण्याकरिता व कल्याणकारी योजना राबविण्याकरिता "मुख्यमंत्री वारकरी महामंडळ" कार्य करणार आहे.
महामंडळामुळे काय फायदा होणार?
प्रामुख्याने वारकरी संप्रदायाच्या अडीअडचणी प्रश्न सोडवणे, सर्व पालखी सोहळा मार्गाची सुधारणा करणे वारकरी भजनी मंडळाला भजन व कीर्तन साहित्य करिता अनुदान देणे. पंढरपूर, देहू, आळंदी, मुक्ताईनगर, सासवड, पिंपळनेर, त्र्यंबकेश्वर, पैठण, कोल्हापूर, शेगाव, तारकेश्वर, भगवानगड, अगस्तीऋषी संत सावता माळी समाज मंदिर अरण तालुका माढा जिल्हा सोलापूर व इतरही तीर्थक्षेत्रांचा विकास या महामंडळाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
त्याचबरोबर चंद्रभागा, इंद्रायणी, गोदावरी व इतर नद्या प्रदूषणमुक्त करण्याबाबतची देखील उपाययोजना महामंडळाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्र्यांची बुलेट स्वारी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 65 एकर येथून आमदार समाधान आवताडे यांच्या समवेत बुलेटवर बसून चंद्रभागा वाळवंट व पत्राशेड येथील दर्शन रांगेची पाहणी केली. दर्शन रांगेतील भाविकांशी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयी सुविधांची माहिती जाणून घेतली.

मुख्यमंत्र्यांनी वारकऱ्यांशी साधला संवाद
मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रा शेड येथील दर्शन रांगेत वारकरी भक्तांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. वारकऱ्यांनी मंदिर समिती व जिल्हा प्रशासनाने केलेल्या नियोजनाबद्दल समाधान व्यक्त केले, पंढरपुरात वारकरी भक्तांना चांगल्या प्रकारच्या सुविधा दिल्या आहेत हे पाहून समाधान वाटत आहे. वारकरी संपूर्णपणे खुश आहेत, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री श्री संत निळोबाराय पालखी समवेत पायी चालले
पालखी मार्गावरून पंढरपूर कडे येत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करकंब येथे श्री संत निळोबाराय पालखीचे पूजन करून दर्शन घेतले. तसेच पालखीतील वारकऱ्यासोबत किमान आठ ते दहा किलोमीटरचे अंतर पायी चालले. यावेळी टाळ गळ्यात घालून मुख्यमंत्री महोदय पांडुरंगाच्या नामस्मरणात तल्लीन झाले.












Click it and Unblock the Notifications