....त्यापेक्षा लाडका गद्दार योजना आणा, संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल
मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीची अद्याप घोषणा झाली नसली तरी काही महिन्यांत निवडणुका होणार असल्याची शक्यता आहे..सर्वच पक्षांकडून विधानसभेची जोरदार तयारी केली जात आहे. महायुतीकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी लाडकी बहीण ही योजना आणली आहे. या योजनेनंतर लाडका शेतकरी या योजनेची घोषणा केली करण्यात आली आहे, यावरुन शिवसेना (उबाठा) नेते खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्यावर हल्लाबोल केला.
संजय राऊतांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना लाडकी बहिण योजनेनंतर सरकारने आणलेल्या लाडका शेतकरी या योजनेबद्दल विचारणा करण्यात आली. यावर लाडकी बहिण, लाडका शेतकरी या योजना आणण्यापेक्षा लाडका गद्दार ही योजना आणा, अशी कडाडून टीका केली.

काय म्हणाले संजय राऊत?
"लाडका शेतकरी या योजनेची घोषणा केली आहे, करु द्या. याआधी शेतकरी माझा लाडका नव्हता का? यांचाच लाडका आहे का? त्यांनी लाडका गद्दार ही योजना आणायला हवी. लाडका गद्दार, लाडका बेईमान या योजनेची गरज आहे. कारण भविष्यात त्यांचे सरकार गेल्यावर त्यांना आपल्या लाडक्या गद्दारांना घेऊन बसावे लागेल", अशी टीका संजय राऊतांनी केली.
लाडका शेतकरी योजना काय?
बीडमध्ये राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कृषी महोत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली. "लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडका शेतकरी योजना राबवणार", अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृषी महोत्सवात केली.त्याबरोबरच सोयाबीन व कापसाला हेक्टरी पाच हजार रुपये मदत दिली जाईल. तसेच ई पिक पाहणीची अट रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे जमा तसेच मागेल त्याला शेततळं आणि मागेल त्याला सोलर, अशा अनेक योजना सरकारने सुरु केल्या आहेत", असंही मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.












Click it and Unblock the Notifications