जरांगेंची प्रकृती बिघडली, सरकारची चिंता वाढली; 'वर्षा'वर मध्यरात्री गुप्त बैठक, मंत्री गुपचूप बाहेर
Manoj Jarange : मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी उपोषण करत असलेले मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. सलग दोन दिवस अन्नपाण्याशिवाय असल्याने शनिवारी मध्यरात्री त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. तातडीने डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असून, येत्या काही दिवसांत प्रकृती आणखी गंभीर होण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे. या घडामोडींमुळे राज्य सरकारवर दबाव वाढला आहे.

'वर्षा'वर मध्यरात्री घडामोडी, मंत्री गुपचूप बाहेर!
मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडल्याची बातमी मिळताच सरकारने तातडीने हालचाली सुरू केल्या. शनिवारी रात्री मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि मंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'वर्षा' बंगल्यावर गुप्तपणे भेट घेतली.
जवळपास एक तास चाललेल्या या बैठकीत, जरांगे यांच्या मागण्या आणि सध्याची परिस्थिती यावर चर्चा झाली. या बैठकीनंतर दोन्ही नेते माध्यमांना टाळून गुपचूप बाहेर पडले. यावरून सरकार लवकरच काहीतरी तोडगा काढण्याच्या प्रयत्नात असल्याचं दिसून येत आहे.
जरांगे आपल्या मागण्यांवर ठाम
या बैठकीपूर्वी, न्यायमूर्ती शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. मात्र, जरांगे यांनी आपल्या 'सगेसोयरे' आणि ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागण्यांवर आपण ठाम असल्याचं शिष्टमंडळाला सांगितलं. जरांगे यांच्या या भूमिकेमुळे सरकारची कोंडी झाली आहे.
आता सरकार कशा प्रकारे हा तिढा सोडवते, हे पाहणं महत्त्वाचं आहे. आज सकाळी पुन्हा एकदा मराठा उपसमितीची बैठक बोलावण्यात आली असून, त्यात सखोल चर्चा करून पुढील दिशा ठरवली जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, आझाद मैदानावर मराठा समाजाच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस असून, आंदोलकांची गर्दी वाढत आहे. मराठा बांधव स्वखर्चाने आंदोलकांसाठी जेवण आणि नाश्त्याची व्यवस्था करत आहेत.












Click it and Unblock the Notifications