मनोज जरांगे पाटलांनी 'ती' अट मान्य केली; शिवनेरीच्या पायथ्यावरून मोठी घोषणा
मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे निघालेले मनोज जरांगे पाटील यांनी आता आपली भूमिका अधिक स्पष्ट केली आहे. शिवनेरी किल्ल्याचे दर्शन घेऊन त्यांनी आपल्या मोर्चाला पुन्हा सुरुवात केली. यावेळी जुन्नरमध्ये भाषण करताना त्यांनी सरकारला अनेक मोठे संकेत दिले.

आंदोलनाला परवानगी, पण मागण्यांची अंमलबजावणी कधी?
जरांगे पाटलांनी मराठा आंदोलनाला परवानगी दिल्याबद्दल सरकारचे आभार मानले. "आम्ही कायद्याचे पालन करत आहोत आणि नियमांमध्ये राहूनच आंदोलन करणार आहोत. आमच्या आंदोलनाला परवानगी दिल्याबद्दल आम्ही सरकारचे कौतुक करतो", असे ते म्हणाले. मात्र, त्याचवेळी त्यांनी उपमुख्यमंत्र्यांना एक विनंतीही केली. "देवेंद्र फडणवीस यांना माझी विनंती आहे की, जोपर्यंत आमच्या मागण्यांची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत आम्हाला आंदोलन करण्याची परवानगी द्यावी", अशी मागणी त्यांनी केली.
'पाच हजार आंदोलकांची अट मान्य, पण मी मागे हटणार नाही'
मुंबई पोलिसांनी आझाद मैदानावर फक्त पाच हजार आंदोलकांनाच परवानगी देण्याची अट घातली आहे. यावर बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी मोठे विधान केले. "सरकारने घातलेली पाच हजार आंदोलकांची अट आम्हाला मान्य आहे. आझाद मैदानावर आम्ही चार हजार लोक बसू. उर्वरित आंदोलक इतर ठिकाणी बसतील. पण मी माझ्या भूमिकेपासून मागे हटणार नाही", असे त्यांनी ठामपणे सांगितले.
जरांगे पाटील यांनी आंदोलकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. "हाता-तोंडाला आलेला घास वाया घालवू नका. आपल्याला कायद्याचे पालन करायचे आहे", असे त्यांनी नमूद केले.
मनोज जरांगे यांच्या प्रमुख मागण्या
- कुणबी-मराठा नोंदी: मराठा आणि कुणबी एकच असून, त्या नोंदींची तात्काळ अंमलबजावणी व्हावी. अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही.
- गॅझेटियर लागू करा: हैदराबाद गॅझेटियरचा अभ्यास खूप दिवसांपासून सुरू आहे. त्याऐवजी सातारा आणि बॉम्बे गॅझेटियर लागू करावे.
- सगेसोयरे अध्यादेश: 'सगेसोयरे' अध्यादेशाची योग्य व्याख्या करून ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत, त्यांच्या नातेवाईकांना पोटजात म्हणून आरक्षण द्यावे.
- गुन्हे मागे घ्या: आंदोलकांवरील सर्व गुन्हे सरसकट मागे घेण्यात यावे.
- कायद्यात बसणारे आरक्षण: मराठा समाजाला कायद्यात टिकणारे आणि मान्य होणारे आरक्षण द्यावे.












Click it and Unblock the Notifications