सरकारने गोळ्या घातल्या तरी माघार नाहीच! ओबीसी मधूनच आरक्षण घेईन -मनोज जरांगे
लातूर : सरकारने गोळ्या घातल्या तरी आता माघार नाहीच! मराठा समाजासाठी ओबीसी मधूनच आरक्षण मिळवेल असा इशारा मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिला. मनोज जरांगे पाटील हे सध्या मराठवाड्यात शांतता रॅली काढत आहेत. लातूर येथे रॅलीनंतर आयोजित सभेत ते होते.
नांदेडमध्ये भव्य रॅली
नांदेडहुन लातूरमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांची भव्य रॅली काढण्यात आली. लातूर शहरातील छत्रपती राजर्षी शाहू महाराज चौकातून त्यांच्या रॅलीला सुरुवात झाली. त्यानंतर गंजगोलाई, महात्मा गांधी चौक मार्गे ही भव्य रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौकात आली.

परिणामी लातूर शहरातील या मार्गावरील वाहतूक ही ठप्प झाली होती. प्रशासनाने या मार्गावरील वाहतुक अन्य मार्गावरून वळवली होती. यावेळी रॅलीसोबत हजारोंच्या संख्येने मराठा बांधव सहभागी झाले होते. या रॅलीचे छत्रपती शिवाजी महाराज चौकात एक मोठ्या सभेत रूपांतर झाले. यावेळी त्यांनी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण घेणार असल्याचा निर्धार व्यक्त केला.
सरकार भुजबळांच्या तालावर नाचतेय
मनोज जरांगे म्हणाले, राज्य सरकार माझ्या विरोधात असून त्यांनी माझ्याविरोधात एसआयटी लावली. त्यांचे हे मला रोखण्यासाठी षडयंत्र आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्या तालावर सरकार नाचत असल्याचा आरोप केला. सरकारने मला गोळ्या घातल्या तरी आता मी माघार नसल्याचे यावेळी जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं.
'सरकार...आक्रोश समजून घ्या'
मनोज जरांगे म्हणाले, सत्ताधाऱ्यांनी मराठा समाजाचा आक्रोश समजून घ्यावा, मराठा तरुणांनी या आरक्षणासाठी बलिदान दिले आहे. मी प्रामाणिक आहे, मला अनेक आमिष आली पण मी त्यासर्वांवर लाथ मारली. मी समाजाला माय-बाप मानतो, मराठा समाजासोबत मी कधीच गद्दारी करणार नाही, असेही त्यांनी जमलेल्या मराठा बांधवांपुढे स्पष्ट केलं.
छगन भुजबळांवर टीका
मनोज जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळ तसेच गिरीश महाजन यांच्यावरही जोरदार टीका केली. भुजबळ यांच्या वक्तव्यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी समाजात फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. मनोज जरांगे पाटील हे आज सकाळी धाराशिव कडे रवाना झाले आहेत.












Click it and Unblock the Notifications