तू फक्त २५ तारखेपर्यंत थांब... धाराशिवच्या सभेत मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंना दुसऱ्यांदा थेट इशारा
धाराशिव येथील आक्रोश मोर्चात आत मनोज जरांगे यांनी पुन्हा मंत्री धनंजय मुंडे यांना थेट नाव घेऊन टार्गेट केले. यापुढे मराठ्यांना त्रास दिला तर गाठ माझ्याशी आहे, असं म्हणत जरांगे यांनी मुंडे यांना ललकारले. येत्या २५ तारखेनंतर मी तुमची सगळी मस्ती उतरवतो, असं म्हणत जरांगे यांनी धनंजय मुंडे यांना थेट चॅलेंज दिले.

काय म्हणाले जरांगे?
धाराशिव येथील मोर्चात जरांगेंचा मूड आक्रमक दिसला. ते म्हणाले, यापुढे जर मराठ्यांना त्रास झाला, तर सामना मनोज जरांगेशी आहे. धनंजय मुंडे यांना सांगतो, तुमची टोळी थांबवा. ही धमकी नाही, तर तुम्हाला सावध करतोय. यापुढे तुमच्या गुंडांनी कोणाला त्रास दिला, तर लक्षात ठेवा त्यांचा बंदोबस्त आम्ही करणार आहोत. तुमचे पाप झाकण्यासाठी समाजाचे पांघरुन घेऊ नका. मी मागे लागलो, तर पाणी पाजल्याशिवाय सोडत नाही. मी २५ तारखेपर्यंत काहीच बोलणार नाही. उपोषण झाल्यावर मराठा समाजास आरक्षण मिळाल्यावर, मग धनंजय मुंडे तुह्याकडे पाहतो, असा इशाराच जरांगे यांनी दिला.
हा मोक्का अमान्य
आठ आरोपींना मोक्का लावण्यात आला. या विषयावरही जरांगे यांनी त्यांचे मत व्यक्त केले. ते म्हणाले, संतोष देशमुख प्रकरणातील खून प्रकरणातील आरोपींवर मोक्का लागला. पण जर खंडणीतील आरोपीला मोक्का लागला नाही, तर आम्हाला हा मोक्का मान्य नाही. खंडणीमुळेच हा गुन्हा घडला त्यामुळे खंडणीतील आरोपींनाही मोक्का लागला पाहिजे. खंडणीतील आरोपी हे खुनाच्या गुन्ह्यातही आले पाहिजेत. मुख्यमंत्रीसाहेब, तुम्ही देशमुख कुटुंबाला शब्द दिला आहे, तो पाळा, असे आवाहनही त्यांनी मुख्यमंत्र्यांना केले.
मराठा समाजाला आवाहन
मराठा समाजास संबोधित करताना मनोज जरांगे म्हणाले, तुमचा समाज तुम्हाला जिवंत ठेवावा लागणार आहे. गाफील राहू नका. एकमेकांना मदत करा, नाहीतर मुडदे पडतील. हे मुठभर आहेत, त्यांचा माज उतरवण्यास वेळ लागणार नाही. मी त्यांना मोजत नाही. मोजणारही नाही. मी मरणाला घाबरत नाही. परंतु तुम्ही बेफीकीर राहू नका. या लोकांना नीट करण्याचा सर्व गोष्टी मराठ्यांचा हातात आहे. आता जशाच्या तसे उत्तर द्यावे लागणार आहे, असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले.












Click it and Unblock the Notifications