मोठी बातमी ! मालेगाव बॉम्बस्फोटाचा निकाल आज शक्य, 2008 साली नेमकं काय घडलं होतं?
2008 मध्ये मालेगावच्या भिक्खू चौकात झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल आज, मुंबईतील विशेष न्यायालयात लागण्याची शक्यता आहे. या खटल्यातील प्रमुख संशयित आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह सात जणांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) मृत्युदंडाची शिक्षा देण्याची मागणी केली असल्याने, या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

काय आहे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण?
29 सप्टेंबर 2008 रोजी नवरात्रीच्या पूर्वसंध्येला आणि रमजान महिन्यात रात्री 9:35 वाजता मालेगावच्या भिक्खू चौकातील एका हॉटेलजवळ शक्तिशाली बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटात 6 निष्पाप मुस्लिम नागरिक ठार झाले तर 100 हून अधिक लोक जखमी झाले होते, ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. स्फोटस्थळी सापडलेली मोटारसायकल साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या मालकीची असल्याने पोलिसांनी सुरुवातीला त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.
मुख्य आरोपी आणि आरोप:
या बॉम्बस्फोटामागे हिंदुत्ववादी संघटना 'अभिनव भारत' चा हात असल्याचा आरोप आहे. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय, स्वामी दयानंद पांडे, अजय रायकर, समीर कुलकर्णी, सतीश चतुर्वेदी यांचा या कटात सहभाग असल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला आहे. हिंदुत्ववादी विचारसरणीतूनच या बॉम्बस्फोटाची योजना आखण्यात आली आणि तिची अंमलबजावणी करण्यात आली असा आरोप त्यांच्यावर आहे.
तपास यंत्रणा आणि खटल्याचा प्रवास:
सुरुवातीला मालेगाव पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला, त्यानंतर तपास महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाकडे (ATS) सोपवण्यात आला आणि पुढे तो NIA कडे वर्ग करण्यात आला. गेल्या 17 वर्षांपासून मुंबईच्या NIA विशेष न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू आहे. NIA ने साध्वी प्रज्ञासिंह यांना जामीन मंजूर केला असला तरी, काही दिवसांपूर्वीच त्यांनी त्यांच्यासह सात जणांना मृत्युदंडाची शिक्षा देण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती.
एका वडिलांची न्याय मिळण्याची आशा
या भीषण बॉम्बस्फोटात लियाकत शेख यांनी आपली 10 वर्षीय चिमुरडी, फरहीन गमावली. वडापाव आणण्यासाठी गेलेली फरहीन कधीच परतली नाही. तिचा निष्पाप चेहरा आजही लियाकत शेख यांच्या डोळ्यासमोर आहे. त्यांना आशा आहे की, आजच्या निकालाने आपल्या मुलीला न्याय मिळेल.
प्रकरणातील महत्त्वाचे टप्पे (कालानुक्रम)
- 29 सप्टेंबर 2008: मालेगावात बॉम्बस्फोट, 6 ठार, 100 जखमी.
- 4-5 नोव्हेंबर 2008: लेफ्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित यांना अटक.
- 26-29 नोव्हेंबर 2008: 26/11 मुंबई दहशतवादी हल्ले; मालेगाव प्रकरणाचे मुख्य तपासनीस हेमंत करकरे शहीद.
- 20 जानेवारी 2009: भारतीय दंड संहिता, मकोका (MCOCA), बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) कायदा (UAPA) आणि स्फोटक पदार्थ कायद्याच्या कलमांखाली 4,528 पानांचे आरोपपत्र दाखल.
- 31 जुलै 2009: मकोका आरोप रद्द, परंतु 19 जुलै 2010 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने ते पुन्हा लावले.
- डिसेंबर 2010: NIA तपासात सामील.
- 23 मे 2013: NIA ने मुंबईच्या विशेष न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल केले.
- 24 जुलै 2015: तत्कालीन विशेष सरकारी वकील रोहिणी सालियन यांनी प्रकरणात मवाळ भूमिका घेण्यासाठी दबाव आणल्याचा दावा केला.
- 15 एप्रिल 2016: NIA ने आपण कोणताही पक्ष घेत नसल्याचे किंवा विरोध करत नसल्याचे स्पष्ट केले.
- डिसेंबर 2016: निलंबित पोलिस अधिकारी महबूब मुजावर यांनी दोन फरार आरोपी, रामजी उर्फ रामचंद्र कलसांगरा आणि संदीप डांगे, यांचा पोलिस कोठडीत मृत्यू झाल्याचा दावा केला, ज्यामुळे NIA ने चौकशीचे आश्वासन दिले.
- 25 एप्रिल 2017: कर्नल पुरोहित यांचा जामीन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला, तर साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना जामीन मंजूर.
- 21 ऑगस्ट 2017: सर्वोच्च न्यायालयाने कर्नल पुरोहित यांना जामीन मंजूर केला.
- 23 ऑगस्ट 2017: कर्नल पुरोहित तळोजा मध्यवर्ती कारागृहातून बाहेर आले.
- 27 डिसेंबर 2017: कर्नल पुरोहित आणि साध्वी प्रज्ञा यांच्याविरुद्धचा मकोका खटला रद्द करण्यात आला.
- 30 ऑक्टोबर 2018: सात आरोपींविरुद्ध आरोप निश्चित करण्यात आले.
- 25 जुलै 2024: NIA न्यायालयात अंतिम सुनावणी सुरू झाली.
- 19 एप्रिल 2025: खटल्याच्या न्यायालयाने निकाल जाहीर करण्यासाठी 8 मे ही तारीख निश्चित केली होती, परंतु ती 31 जुलै 2025 रोजी मुंबई सत्र न्यायालय विशेष एनआयए कोर्ट निर्णय देणार असल्याचे जाहीर केले.
आजच्या निकालाकडे मालेगावसह संपूर्ण देशाचे लक्ष लागले असून, न्यायालयात काय निर्णय येतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.












Click it and Unblock the Notifications