हिवाळी अधिवेशन दिवस 1ला: शोकप्रस्तावानंतर कामकाज दिवसभरासाठी स्थगित;पुरवणी मागणीबाबत निर्णय!
Maharashtra Winter Session Day 1 : महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथे आज (सोमवार, ८ डिसेंबर २०२५) विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. वंदे मातरम् आणि राज्यगीताने दोन्ही सभागृहांमध्ये कामकाजाचा औपचारिक शुभारंभ झाला. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच दोन्ही सभागृहांत शोकप्रस्ताव मांडल्यानंतर कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले. दरम्यान, विधानसभेत एकूण ७५ हजार २८६ कोटी रुपयांची पुरवणी मागणी सादर करण्यात आली.

अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचे प्रमुख मुद्दे
१. शोकप्रस्तावानंतर कामकाज स्थगित
पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहांमध्ये निधन झालेल्या माजी सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकप्रस्ताव मांडण्यात आले. विधानसभा सदस्य व माजी राज्यमंत्री शिवाजीराव भानुदास कर्डिले, माजी मंत्री महादेवराव सुकाजी शिवणकर, भारत राजाभाऊ बोंद्रे यांच्यासह एकूण दहा दिवंगत माजी सदस्यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडण्यात आला. यानंतर दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.
२. ७५,२८६ कोटी रुपयांची पुरवणी मागणी
राज्याच्या तिजोरीवरील मोठा भार दर्शवत, विधानसभेत ७५,२८६ कोटी रुपयांची पुरवणी मागणी सादर करण्यात आली. आता पुढील दिवसांमध्ये या मागणीवर चर्चा व मतदान होणार आहे.
३. अध्यादेश सभागृहाच्या पटलावर
विधान परिषदेत विविध विभागांशी संबंधित सहा महत्त्वाचे अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले.
- मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) अध्यादेश, २०२५
- महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था (सुधारणा) अध्यादेश, २०२५
- महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) (सुधारणा) अध्यादेश, २०२५
- महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (सुधारणा) अध्यादेश, २०२५
४. शासकीय विधेयक सादर
विधानसभेत एकूण सात शासकीय विधेयक (Government Bills) सादर करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) (सुधारणा) विधेयक, २०२५ आणि महाराष्ट्र जन विश्वास (तरतुदींची सुधारणा) विधेयक, २०२५ यांचा समावेश आहे.
विरोधी पक्षनेत्याच्या नियुक्तीवरून सरकारला सवाल
काँग्रेसचे नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी विरोधी पक्षनेत्याच्या रिक्त पदावरून सरकारवर सडकून टीका केली. त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि सरकारवर मनमानी कारभाराचा आरोप केला.
"आम्ही नाव दिलंय, तर तुम्हाला विरोधी पक्ष नेता नेमायला काय दुखणे आहे? संविधानिक पद रिक्त ठेवून कारभार करत आहेत. हा मनमानी कारभार आहे."
ऐतिहासिक संदर्भ: १९८० मध्ये १४ आणि १९८५ मध्ये १६ आमदार असतानाही विरोधी पक्षनेता नियुक्त करण्यात आला होता, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
संविधानिक पद: सभापती राम शिंदे यांनी 'प्रथा-परंपरा' पाळण्याची गरज नसल्याचे वक्तव्य केले होते, त्यावर वडेट्टीवार यांनी हे 'संविधानिक पद' असून सभापतींच्या खुर्चीवरून 'असंविधानिक' बोलणे चुकीचे असल्याचे मत व्यक्त केले.
५. अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी फेटाळली
काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी केली होती. मात्र, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ही मागणी फेटाळून लावली.












Click it and Unblock the Notifications