महाराष्ट्राचं हवामान अचानक बदललं; 'या' भागात पावसाची शक्यता; पुढचे 4 दिवस धोक्याचे? वाचा
दिल्ली वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार देशातील अनेक राज्यातील हवामान अचानक बदलले आहे. १ मे च्या रात्री हवामान बदलास सुरुवात होईल, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे दोन ते चार मे या कालावधीत देशातील अनेक राज्यांत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. राजस्थानच्या पूर्व भागात वाऱ्याची चक्रीय स्थिती तयार झाल्यानंतर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांतही जोरदार ते मध्यम पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

महाराष्ट्रत पाऊस पडणार?
राजस्थानच्या पूर्व भागावर सध्या वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. केरळपर्यंत जाणारी हवेच्या कमी दाबाची रेषा निर्माण झाली आहे. ही रेषा विदर्भातून जाते. त्यामुळे बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे मोठ्या प्रमाणावर राज्याच्या दिशेने येत आहेत. शिवाय स्थानिक पातळीवरील तापमान वाढीमुळे उंच ढगांची निर्मिती होऊन, पुढील चार दिवस मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह राज्यभरात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. पूर्व विदर्भातील बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांत पावसाचा जोर जास्त राहण्याचा अंदाज आहे.
तापमानात चढउतार होणार
भारतीय हवामान विभागाकडून पूर्व विदर्भात आज आणि उद्या हलक्या पावसासह जोरदार वाऱ्यांचा इशारा दिला आहे. नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये ३ मे पर्यंत हलक्या पावसाचा अंदाज आहे. बदललेल्या वातावरणामुळे आज आणि उद्या पूर्व विदर्भातील तापमानात थोडी घट होणार आहे. हवामान विभागाने लोकांना बदलत्या हवामानाचा विचार करून सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. या पावसानंतर राज्यात पुन्हा उष्णता वाढण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात पावसास सुरुवात
हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार भंडारा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. गुरुवारी संध्याकाळी आकाशात काळे ढग दाटून आले. त्यानंतर वादळी वाऱ्यासह पाऊस सुरु झाला. हा पाऊस धान शेतीसाठी फायदेशीर असला तरी मका, बागायती शेतीसाठी नुकसानकारक आहे. गोंदिया जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची जोरदार हजेरी झाली. या पावसामुळे धाण, मका, भाजीपाला आणि इतर पिकांना फटका बसला आहे. अमरावती जिल्ह्यातील मोझरी गावासह परिसरात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसला. अचानक आलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे.












Click it and Unblock the Notifications