IMD Maharashtra News: मुंबईसह मराठवाडा विदर्भात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा
भारतीय हवामान विभागाने (IMD) सोमवारी मुंबईत रात्रीपासून जोरदार पावसाची शक्यता वर्तविली आहे. तसेच मंगळवारी शहर आणि त्याच्या शेजारील ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाच्या मते, सोमवारपासून शहरात हलक्या सरी सुरू होतील, ज्याची तीव्रता वादळी वाऱ्यांसह असणार आहे. मंगळवारी मध्यम सरींमध्ये त्याचे रुपांतर होईल. ठाणे जिल्ह्यासाठी, येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.

मुंबईसह महाराष्ट्रात या भागात 'येलो अलर्ट'
हवामानशास्त्रज्ञांनी सांगितले आहे की, गुरुवारनंतर कोरडे हवामान सुरू होण्यापूर्वी मुंबईत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
येत्या काही दिवसांत केवळ कोकण प्रदेशच नाही तर महाराष्ट्रातील इतर भागांनाही येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. ज्यामध्ये नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सांगली यासारख्या पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे.
दुसरी बाब म्हणजे, राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. अनेक भागात सध्या अवकाळी पावसाचा जोर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तर काही जिल्ह्यामध्ये उन्हाचा चटका असल्याचं चित्र आहे. दरम्यान, या बदलत्या वातावरणाचा शेती पिकांना मात्र फटका बसत आहे. सलग पाचव्या दिवशी नाशिककरांना अवकाळी पावसाने झोडपून काढलं आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास नाशिक शहरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला.
बीडमध्येही दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस
बीड जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने तब्बल तासभर धुमाकूळ घातला. जिल्ह्यातील विविध भागात दुपारनंतर दमदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला असता तरी काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काल देखील जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला होता. बीड, गेवराई पाटोदा वडवणी भागासह इतर ठिकाणी विजेच्या कडगडाटासह पावसाने हजेरी लावली.
धाराशिव जिल्ह्यातही पावसाचा तडाखा!
धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस कोसळला. सोसाटयाच्या वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. अवकाळी पाऊस कोसळल्याने परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान. कडाक्याच्या उन्हात पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात थंडावा , वाढत्या गर्मी पासून काहीसा दिलासा मिळाला आहे.
पुढील तीन-चार दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा
राज्यात पुढील तीन-चार दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र या भागात वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. पश्चिम मध्य प्रदेश आणि परिसरावर समुद्र सापाटीपासून 1.5 ते 7.6 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यापासून उत्तर महाराष्ट्र, कोकण ते अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याची ही माहिती समोर आली आहे.
मान्सून जूनच्या पहिल्या आठवड्यात येणार!
महाराष्ट्रात यंदा लवकरच मान्सूनच्या आगमनाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारत हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, केरळमध्ये दक्षिण-पश्चिम मान्सून 27 मे 2025 रोजी पोहोचण्याची शक्यता आहे, जे नेहमीच्या 1 जूनच्या तुलनेत पाच दिवस लवकर आहे.
केरळमध्ये मान्सून पोहोचल्यानंतर, महाराष्ट्रात मान्सून सामान्यतः 7 ते 10 दिवसांत पोहोचतो. त्यामुळे, महाराष्ट्रात मान्सून जूनच्या पहिल्या आठवड्यात 3 ते 6 जून दरम्यान पोहोचण्याची शक्यता आहे.












Click it and Unblock the Notifications