महाराष्ट्रातील 'हे' शहर ठरले देशातील हाॅट सिटी; उष्माघाताचे 2 बळी गेल्याचा संशय, किती आहे पारा?
गेल्या महिनाभरापासून महाराष्ट्र चांगलाच तापला आहे. एप्रिलमध्ये तर महाराष्ट्रातील अनेक शहरांतील तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेलेले दिसले. महाराष्ट्रातील वाढलेल्या तापमानाबाबत आता एक नवी बातमी समोर आली आहे. नागपूर हे देशातील सर्वात हाॅट सिटी ठरले आहे. शनिवारी नागपूरमध्ये ४४.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हे देशातील सर्वात जास्त तापमान ठरले.

हवामान विभागाचा इशारा
देशाच्या विविध भागांमध्ये उष्णतेची लाट कायम आहे. पुढील चार दिवस उष्णतेच्या लाटेचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दिल्लीत आज वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच जम्मू आणि काश्मीरमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने (IMD) पुढील काही दिवस राजस्थान, मध्य प्रदेश आणि विदर्भात उष्णतेची तीव्र लाट कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. देशातील सर्वात उष्ण शहर नागपूर ठरले आहे.
नागपूर ठरले हाॅट सिटी
महाराष्ट्रातील नागपूर शहरात शनिवारी देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. नागपूरचे तापमान ४४.७ अंश सेल्सिअसवर पोहचले. याआधी शुक्रवारी नागपूरमध्ये ४३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. परंतु शनिवारी यंदाच्या हंगामातील सर्वात उष्ण दिवस ठरला आहे. नागपूर प्रमाणे उत्तर महाराष्ट्रातील भुसावळ शहरात उन्हाचा चटका वाढला आहे. भुसावळचे तापमान पुन्हा ४४.३ अंशावर गेले आहे. आठ दिवसांनी पुन्हा शहराच्या तापमानाने ४४.३ अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला.
महाराष्ट्रात उष्णतेची लाट
यापूर्वी १० एप्रिल रोजी भुसावळ येथे ४४.४ अंश इतके तापमान नोंदवले गेले होते. त्यानंतर वातावरणात थोडाफार बदल होऊन तापमान ४१.५ आणि ४३ अंशांपर्यंत खाली आले होते. मात्र त्यात पुन्हा वाढ झाली. राज्यात वाढलेल्या तापमानामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. सकाळी ९ वाजेपासूनच उन्हाच्या झळा जाणवत आहे. उकाड्यामुळे दुपारी वर्दळ कमी झाली आहे. तापमान ४४.३ अंश कमाल तर २८.३ अंश किमान तापमानाची नोंद झाली.
तापमान वाढण्याची शक्यता
एप्रिल महिन्यातच तापमानाचा पारा वाढल्यामुळे आता मे महिन्यांत काय होईल, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस महाराष्ट्राचा पारा वाढलेला राहण्याचा इशारा दिला आहे. दुपारी घराबाहेर पडणे टाळावे असा इशाराही देण्यात आला आहे. आरोग्य विभागाने लोकांना दुपारी १२ ते ४ या वेळेत घराबाहेर पडू नका, जास्त पाणी प्या आणि हलके सुती कपडे घाला असा सल्ला दिला आहे. उष्णतेमुळे त्रस्त रुग्णांना त्वरित उपचार मिळावेत यासाठी सरकारी रुग्णालयांमध्ये विशेष वॉर्ड तयार करण्यात आले आहेत. मुलांच्या सुरक्षिततेचा विचार करून शाळांच्या वेळा बदलण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
दोन मृत्यू झाल्याचा संशय
उष्णतेमुळे दोन अज्ञात लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पहिली घटना गुरुवारी दुपारी ३:३० वाजता घडली. इमामवाडा परिसरातील टीबी वॉर्डजवळ ६० वर्षांचा एक पुरूष बेशुद्ध अवस्थेत आढळला. त्याला उपचारासाठी मेडिकल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याच दिवशी दुपारी १२:३० वाजता घडलेल्या दुसऱ्या घटनेत, बजाजनगर परिसरातील प्रतापनगर चौकात सुमारे ४० वर्षांचा एक पुरूष बेशुद्ध अवस्थेत आढळला. त्याला रुग्णालयातही नेण्यात आले, पण त्याला वाचवता आले नाही. दोन्ही प्रकरणांमध्ये पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. दोन्ही मृत्यू उष्माघातामुळे झाले असावेत असा संशय आहे.












Click it and Unblock the Notifications