राज्यात आजपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात, परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी बोर्डाची करडी नजर
HSC Board exams: महाराष्ट्र राज्य माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा आज मंगळवार 11 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. राज्यभरातून 15 लाखाहून अधिक विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. मुंबई विभागातून एकूण 342012 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.
वाणिज्य शाखेतून सर्वाधिक म्हणजेच एक लाख 66 हजार 429 विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. त्यानंतर विज्ञान शाखेचे 1 लाख 27704 विद्यार्थी तर कला शाखेचे 47879 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा आजपासून सुरु होत आहे. यंदाही परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटांचा वेळ वाढवून दिला आहे. परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी 271 भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी बोर्डाची करडी नजर
- परीक्षा केंद्रावर गैर प्रकार आढळून आल्यास किंवा गैरप्रकार करण्यास मदत करणा-या व्यक्तींवर दखल पात्र आणि अजामीन पात्र गुन्हा दाखल केला जाणार.
- परीक्षा केंद्राच्या परीसरात प्रशासनामार्फत व्हिडीओ चित्रीकरण होणार
- संवेदनशील परीक्षा केंद्रावर ड्रोन कॅमेराव्हारे करडी नजर असणार
- सर्व परीक्षा केंद्रावर भरारी पथके व बैठकी पथके उपस्थित असणार
- परीक्षा केंद्रापासून 500 मीटर अंतरावरील सर्व झेरॉक्स सेंटर बंद ठेवण्यात येणार
- परीक्षा केंद्राच्या परिसरात कलम 144 लागू करण्यात येणार
विद्यार्थ्यांनी काय काळजी घ्याल?
- विद्यार्थांनी परीक्षेला घरीवरुन निघण्याआधी आपल्या जवळ हॉल तिकिट आणि महाविद्यालयीन ओळखपत्र जवळ असल्याची खात्री करावी.
- विद्यार्थ्यांना आता हॉल तिकिटासोबतच महाविद्यालयाचे ओळखपत्र सोबत ठेवणे अनिवार्य आहे.
- आपल्या घरापासून परीक्षा केंद्र दूर असेल तर वाहतूक कोंडीचा विचार करता पालक आणि विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर वेळेच्या आधी पोहोचलं पाहिजे.
- परीक्षेला जाताना पाण्याची बाटली आणि पेन व महत्त्वाचे इतर साहित्य आवर्जून घ्यावे.
- घरातून बाहेर पडायच्या आधी थोडासा नाश्ता करुन जाणे आवश्यक आहे.












Click it and Unblock the Notifications