हिकमत उढाणांचा 'धनुष्यबाण' परफेक्ट लागण्याची शक्यता; घनसावंगीत राजेश टोपेंची हवा टाईट
Maharashtra Assembly Election 2024 : जालना जिल्ह्यातला घनसावंगी मतदारसंघ ही महाराष्ट्रात चर्चेत असलेल्या मतदारसंघापैकी एक मतदारसंघ आहे. या मतदारसंघाची चर्चा होण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे मराठा आंदोलनाचं केंद्रबिंदु ठरलेलं अंतरावली सराटी हे गाव याच मतदारसंघात येतं. घनसांगवी तालुका, अंबड आणि जालना जिल्ह्यातील काही गावांचा मिळून हा मतदारसंघ तयार झाला आहे.
या मतदारसंघात यावेळी शरद पवार गटाचे विद्यमान आ. राजेश टोपे हे येथून पाचव्यांदा निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात शिवसेना शिंदे गटाचे हिकमत उढाण, अपक्ष सतीश घाटगे, माजी आ. शिवाजी चोथे व वंचित आघाडीच्या कावेरी खटके हे मातब्बरही निवडणूक रिंगणात आहेत. गेल्यावेळी या मतदारसंघात राजेश टोपे व हिकमत उढाण यांच्यातील लढत रंगतदार झाली होती. त्यावेळी टोपे यांनी फक्त साडेतीन हजारांनी पराभव झाला होता. मात्र आता सगळीच गणिते बदलली आहेत. राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. त्यामुळे राजेश टोपे यांच्यासाठी ही निवडणूक सोप्पी नसल्याचे दिसत आहे.

जरांगे पाटील यांचा भुमिकेकडे लक्ष
मनोज जरांगे फॅक्टर मराठवाड्यात लोकसभेला चालला. विधानसभेला तो फँक्टर चालणार नसल्याचे बोलले जातेय. मनोज जरांगे पाटील यांचं अंतरावली-सराटी गाव याच घनसावंगी विधानसभा मतदारसंघात येतं. मनोज जरांगे पाटील यांचा भाजपाला विरोध असल्याचं सांगितलं जातं. मात्र भाजप व महायुतीने मराठ्यांना स्वतंत्र आरक्षणासह इतर अनेक योजना जाहीर केल्यानं वातावरण बदलल्याचंही काहींचं म्हणणं आहे.
मनोज जरांगे पाटील हे देवेंद्र फडणवीस यांच्यावर सातत्याने टीका करत आहेत, पण एकनाथ शिंदेंबद्दल ते बऱ्याचदा चांगलं बोलले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना त्यांनी जाहीर विरोध केलेला नाही. घनसावंगीमध्ये मराठा मतदार बहुसंख्य आहेत. पण भाजपऐवजी येथे शिवसेना शिंदे गटाने उमेदवार दिल्याने मनोज जरांगे फँक्टरचा येथे परिणाम होणार नसल्याचे बोलले जात आहे.
लोकसभेला हिकमत उढाण यांची जादू
लोकसभेला घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून मविआच्या संजय जाधव यांना 89,914 तर महायुतीच्या महादेव जानकर यांना 59,656 मतं मिळाली होती. घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून मविआला 24 हजार 282 एवढं मताधिक्य मिळालं होतं. यात शिवसेनेच्या डॉ. हिकमत उढाण यांच्या व्यूहरचनेचा आणि स्थानिक पक्षीय बांधणीचा मोठा हात होता. तेच डॉ. हिकमत उढाण आता शिवसेना शिंदे गटाकडून लढत आहेत. त्यामुळे राजेश टोपे यांच्यासाठी हे आव्हान सोपं नाहीय.
घनसावंगीमध्ये तिरंगी, चौरंगी लढत नेहमीच राजेश टोपे यांच्या पथ्यावर पडत असल्याचा इतिहास आहे. मात्र मतांचं विभाजन हे टोपे यांच्यासाठीच डोकेदुखी ठरणार असल्याचं गणित मांडलं जातंय. कारण मराठा मतदार हा शिवसेना शिंदे गटामागे तर ओबीसी मतदार हा भाजपमागे असल्याने या दोन्हींचा हिकमत उढाण यांना फायदा होणार असल्याचे दिसत आहे.
महायुतीची कोट्यवधींची विकासकामे
जालना जिल्ह्यात भाजपचे चांगले वजन आहे. भोकरदन, बदनापूर व परतूर या तीन तालुक्यांत भाजपचे आमदार आहेत. घनसांगवी व जालना या दोन तालुक्यातही भाजपची ताकद चांगली आहे. शेतकरी सन्मान योजना, लाडकी बहिण योजना, लाडका भाऊ योजना यासह शासनाच्या योजनांचे घनसांगवीत हजारो लाभार्थी आहेत. याशिवाय भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे व इतर आमदारांनी घनसावंगी व इतर तालुक्यात कोट्यवधींची विकासकामे केलेली आहेत. गेल्या तीन-चार वर्षात शरद पवारांच्या या बालेकिल्ल्यात भाजप, शिंदे गटाने आपली ताकद वाढवलेली आहे. हे सर्व पाहता आगामी विधानसभेत शिंदे गटाचे हिकमत उढाण यांचे पारडे सध्यातही जड दिसत आहे.
मतदारसंघाच्या समस्या बनल्या कळीचा मुद्दा
या मतदारसंघात पूर्वीपासून उसाचे गाळव व उसाचा दर हे कळीचे मुद्दे राहिले आहेत. प्रमुख दोन्ही उमेदवारांसह घाटगे यांचाही साखर कारखाना आहे. त्यामुळे उस दराचा मुद्दा येथे राजेश टोपे यांच्यासाठी कळीचा मुद्दा ठरणार असल्याचे बोलले जातेय. मतदारसंघातील रस्त्यांसह इतर मूलभुत सोयी-सुविधांचा प्रश्न कायम आहे. टोपे यांनी एवढी वर्षे सत्ता भोगली तरी, म्हणावा असा विकास झालेला नाही. महायुतीकडून हेच मुद्दे प्रचारात घेतले जात आहे. राजेश टोपे यांनी गेल्या 25 वर्षांत मतदारसंघाला आहे त्याच समस्यांमध्ये झुलवत ठेवल्याचा आरोप होत आहे.












Click it and Unblock the Notifications