शिंदे यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब; शरद पवारांचा फुगा फुटला
Eknath Shinde leadership is successful : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता आकडेवारीची चर्चा सुरू झाली आहे. भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक 132 जागा जिंकले असून त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला 57 जागा मिळाल्या आहेत, अजित पवार यांचे नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या आहेत.
काँग्रेसने 16 जागा जिंकले असून उद्धव ठाकरे गटाला 20 आणि शरद पवार गटाला अवघ्या दहा जागा मिळाल्या आहेत. चांगल्या जागा जिंकून एकनाथ शिंदे यांनी आपला स्ट्राईक रेट देखील उत्तम ठेवला असून त्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाले आहे.

भाजपने या निवडणुकीत 288 पैकी 149 जागा लढवल्या त्यापैकी 132 जागा जिंकल्या. भाजपच्या यशाची टक्केवारी 88.59 % इतकी आहे. भाजप पाठोपाठ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा स्ट्राईक रेट अधिक आहे. शिंदे यांच्या सेनेने 87 जागा लढवल्या आणि त्यापैकी 57 जागा जिंकल्या. शिंदे यांच्या यशाची टक्केवारी 70. 37 % इतकी आहे. त्यापाठोपाठ अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने उत्तम कामगिरी केली असून लढवलेल्या 59 जागांपैकी तब्बल 41 जागा जिंकल्या आहेत.
अजित पवार यांच्या यशाची टक्केवारी 69.49%इतकी आहे. महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदासाठी प्रचंड आग्रही असलेल्या उद्धव ठाकरे यांचीही या निकालांनी साफ निराशा झाली आहे. लढलेल्या 95 जागांपैकी अवघ्या 20 जागा उद्धव ठाकरे गटाला मिळाल्या. त्यांच्या यशाचे प्रमाण 21.05% इतके होते.
महाविकास आघाडीची सर्वाधिक मदार शरद पवार यांच्यावर होती. पक्ष फुटल्यामुळे चवताळून उठलेल्या पवारांनी प्रकृती ठीक नसतानाही अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला होता. लोकसभा निवडणुकीत वेचून वेचून उमेदवार दिले होते. लोकसभेत पवारांच्या राष्ट्रवादीचे यशाचे प्रमाण सर्वाधिक होते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर पवारांच्या पक्षात नेत्यांचा ओघ मोठ्या प्रमाणावर वाढला होता.
विशेषतः अजित पवार आणि भाजप यांच्यातून पवारांकडे जाणाऱ्या नेत्यांचे प्रमाण अधिक होते. लोकसभेत सर्वाधिक चांगली कामगिरी करणाऱ्या शरद पवारांना आणि त्यांच्या पक्षाला विधानसभा निवडणुकीत जोरदार दणका बसला. तब्बल 86 जागा लढणाऱ्या शरद पवारांच्या गटाला अवघ्या दहा जागा मिळाल्या आणि या पक्षाचा स्ट्राइक रेट 11. 62 % इतका झाला.
लोकसभा निवडणुकीतील यशामुळे हवेत असलेल्या महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने चांगले जमिनीवर आणले. महाविकास आघाडीला आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या दृष्टीने प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे












Click it and Unblock the Notifications